राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन २३ फेब्रुवारीपासून;अर्थसंकल्प ६ मार्च रोजी

मुंबई, दि. १० : राज्य विधिमंडळाचे मुंबईत होणाऱ्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज सोमवार, २३ फेब्रुवारी ते बुधवार, २५ मार्च २०२६ पर्यत निश्चित करण्यात आले आहे. ६ मार्च रोजी अर्थसंकल्प मांडण्यात येणार आहे, असा निर्णय कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

विधानभवन येथे विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची बैठक झाली. बैठकीला विधानपरिषद सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड.राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्यमंत्री चंद्रकांतदादा पाटील, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार, आमदार सर्वश्री अनिल परब, प्रसाद लाड, भास्कर जाधव, जयंत पाटील, सुनील प्रभु, भाई जगताप, प्रवीण दरेकर, विक्रम काळे, सतेज पाटील, विधिमंडळाचे सचिव जितेंद्र भोळे  व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

राज्याचे उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजन मंत्री, राज्य उत्पादन शुल्क मंत्री दिवंगत अजित पवार यांना कामकाज सल्लागार समितीच्या दोन्ही  बैठकीत श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी दोन्ही सभागृहात शोक प्रस्ताव मांडण्यात येणार आहे.

अधिवेशन काळात शनिवार २८ फेब्रुवारी शासकीय सुट्टीच्या दिवशी विधिमंडळ कामकाज होणार आहे. सोमवार दि. २ मार्च रोजी होळी आणि ३ मार्च रोजी धूलिवंदन असल्याने कामकाज होणार नाही. १९ मार्चला गुढीपाडव्याची सार्वजनिक सुटी असल्याने या दिवशी कामकाज होणार नाही. तसेच २० मार्च रोजीही विधिमंडळ कामकाज होणार नाही.

 

संयुक्त राष्ट्र संघाने सन २०२६ हे ‘आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष’ म्हणून घोषित केले आहे. यावर चर्चा करण्यात येणार आहे.
जागतिक महिला दिनानिमित्त दिनांक ९ मार्च रोजी दोन्ही सभागृहात महिला दिनानिमित्त चर्चा होणार आहे.
मराठी भाषा गौरव दिननिमित्त चर्चा होणार आहे
निवृत्त होणाऱ्या सदस्यांचा निरोप समारंभ होणार आहे.

०००

काशीबाई थोरात/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *