मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विश्वविजेत्या भारतीय संघाचे अभिनंदन

सलग दोन विश्वचषकांवर भारताचे नाव; भारतीय क्रिकेट प्रेमींसाठी अनोखी भेट

मुंबई, दि. ८ : आयसीसीच्या टि ट्वेंटी विश्वचषकाच्या सलग दुसऱ्या स्पर्धेत विश्वचषकांवर नाव कोरण्याची भारतीय संघाची ऐतिहासिक कामगिरी भारतीय क्रिकेट प्रेमींसाठी अनोखी भेट आहे. ही कामगिरी आणि खेळी क्रिकेट जगत कधीही विसरू शकणार नाही. त्यामुळे या ऐतिहासिक विजयासाठी जिगरबाज भारतीय क्रिकेटपटूंचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या भारतीय संघाचे अभिनंदन केले आहे.

‘अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवरील या अंतिम सामन्यात भारतीय खेळाडूंनी सुरुवातीपासूनच जिगरबाज खेळी केली. संजू सॅमसन यांच्यासह फलंदाजांनी धुवांधार धावा काढल्या तर गोलंदाजानी कमाल दाखवली. अक्षर पटेल, जसप्रीत बुमराह यांनी भेदक गोलंदाजीने प्रतिस्पर्धी संघाला गारद केले. क्षेत्ररक्षणातही ईशांत किशन, तिलक वर्मा यांनी उत्कृष्ट प्रदर्शन केले. क्रिकेट हा सांघिक खेळ आहे, त्यासाठीची खिलाडू वृत्ती, मेहनत यांचे दर्शन भारतीय संघाने घडवले. या ऐतिहासिक विजयात संघातील सर्व खेळाडू, त्यांचे प्रशिक्षक – मार्गदर्शक, व्यवस्थापनातील अधिकारी – कर्मचारी असे सर्वांचे निश्चितच योगदान आहे. भारतीयांच्या क्रिकेट प्रेमाची सार्थ ओळख जगाला करून देण्याची कामगिरी आपल्या भारतीय संघाने केली आहे. त्यासाठी या सर्वांचे मनापासून अभिनंदन आणि पुढील वाटचालीस खूप खूप शुभेच्छा..!, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अभिनंदन संदेशात म्हटले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *