भारतरत्न डॉ. एम.एस.स्वामिनाथन यांचा जन्मदिवस राज्यात ‘शाश्वत शेती दिन’ म्हणून साजरा होणार – कृषिमंत्री ॲड.माणिकराव कोकाटे

मुंबई, दि. २९ : हरितक्रांतीचे प्रणेते भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांचे कृषी क्षेत्रातील भरीव योगदानाला अभिवादन म्हणून त्यांच्या जन्मशताब्दी जयंतीच्या औचित्याने निमित्त जन्मदिवस ७ ऑगस्ट हा दरवर्षी ‘’शाश्वत शेती दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिली.

भारतरत्न डॉ. स्वामिनाथन यांनी गहू आणि भात पिकांची उत्पादकता व उत्पादन वाढीकरिता केलेल्या संशोधनामुळे देश अन्नधान्यात स्वयंपूर्ण व आर्थिकदृष्ट्या मजबूत झाला. त्यांच्या महान कार्य, योगदान, समर्पण आणि नम्रतेसाठी भारत सरकारने त्यांना २०२४ मध्ये ‘भारतरत्न’ नागरी पुरस्काराने सन्मानित केले. तसेच, संयुक्त राष्ट्रांनी त्यांना आर्थिक पर्यावरणाचे जनक असे गौरवले आहे. ‘शाश्वत शेती दिनानिमित्त’ राज्यातील सर्व कृषी विद्यापीठांमध्ये ‘डॉ. एम. एस. स्वामिनाथन बायो हॅप्पीनेस सेंटर’ स्थापन करण्यात येणार आहे.

भारतरत्न डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांचे कृषी क्षेत्रातील योगदान, शाश्वत शेती, हवामान अनुकूलन, महिला शेतकरी इ. बाबीतील विशेष कार्य विचारात घेऊन त्यानुंषगाने ‘शाश्वत शेती दिन’ राज्य, जिल्हा व तालुकास्तरावर, विद्यापीठस्तरावर साजरा करणे, त्यांच्या नावे पुरस्कार देणे आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.

कृषी आयुक्त कार्यालयाला या दिवसाच्या यशस्वी आयोजनासाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्याचे असे कृषिमंत्री अॅड. माणिकराव कोकाटे यांनी सांगितले.

*****

संध्या गरवारे/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *