विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षण देण्याची प्रक्रिया गतिमान करावी – शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

मुंबई दि. ९ : ‘आनंददायी शनिवार’ या उपक्रमांतर्गत शाळांमध्ये प्रत्येक शनिवारी विद्यार्थ्यांना सैनिकी शिक्षण देणे शक्य आहे. प्रशासनाने याबाबतची प्रक्रिया गतिमान करावी, असे निर्देश शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या दालनात झालेल्या बैठकीत माजी सैनिकांमार्फत विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, शिक्षण आयुक्त सच्चिंद्र प्रताप सिंह, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक राहूल रेखावार, सैनिक कल्याण विभागाचे संचालक कर्नल दीपक ठोंगे, सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव गणेश पवार, शालेय शिक्षण विभागाचे उपसचिव तुषार महाजन, राज्य प्राथमिक शिक्षण परिषदेचे सहसचिव गोविंद कांबळे, अवर सचिव अनिरुद्ध कुलकर्णी आदी उपस्थित होते.

शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे म्हणाले, शालेय वेळापत्रक विचारात घेऊन ‘आनंददायी शनिवार’ अंतर्गत सैनिकी शिक्षण देण्याबाबत नियोजन करण्यात यावे. तसेच आनंददायी शनिवार अंतर्गत योग, स्वसंरक्षणासाठी कराटे आदी बाबींचेही प्रशिक्षण दिले जावे. यासाठी कामकाजाचे दिवस, उपलब्ध तासिका विचारात घेतल्या जाव्यात. शालेय शिक्षण विभाग आणि माजी सैनिक कल्याण विभाग यांच्या समन्वयाने सैनिकी शिक्षण देण्याबाबतच्या उपक्रमाची शिस्तबद्ध आणि प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देशही श्री. भुसे यांनी दिले.

०००००

बी.सी.झंवर/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *