यवतमाळ, दि. ३० (जिमाका): सर्वसामान्य नागरिकांना चांगल्या आरोग्य सुविधा देणे आरोग्य विभागाची जबाबदारी आहे. आरोग्य संस्था केवळ उपचारासाठी नसून प्रतिबंधात्मक उपाययोजना, विविध आरोग्यविषयक उपक्रम, वेळेवर निदानासाठीही महत्त्वाच्या आहेत. पुढील काळात जिल्ह्यात आरोग्य सुविधा, उपक्रमांना गती दिल्या जाईल, असे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.
उपजिल्हा रुग्णालय, दारव्हा येथे त्यांनी विविध आरोग्य विषयक बाबींचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॅा.सुखदेव राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी सुभाष ढोले, उपविभागीय अधिकारी विजय सुर्यवंशी, तहसीलदार रवी काळे, मुख्याधिकारी विठ्ठल केदारे, अकोला येथील आरोग्य विभागाचे सहायक उपसंचालक डॉ.सुशीलकुमार वाघचोरे, दारव्हा उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ.राजेश मनवर, निवासी आरोग्य अधिकारी रमेश मांडन, पोलिस निरीक्षक शिवप्रकाश मुळे, यशवंत पवार, मनोज सिंगी आदी उपस्थित होते.
पालकमंत्री राठोड म्हणाले की, गोरगरीब व गरजूंना वेळेवर उपचार मिळणे गरजेचा आहे. उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी यांनी मुख्यालयात राहणे आवश्यक आहे. रुग्णालयात मंजूर पदांचा देखील त्यांनी आढावा घेतला. उपजिल्हा रुग्णालयामधील स्वच्छता, रुग्णालयामधील आहार सुविधा, नियुक्त कंत्राटदारांकडून रुग्णालयात रोज दोन्ही वेळा रुग्णांना चहा, नास्ता, जेवण व फळ फ्रूट वितरण, त्याची गुणवत्ता, दैनंदीन वापराच्या कापडांची धुलाई करून रुग्णांना देण्यात येते किंवा नाही याबाबत त्यांनी आढावा घेतला.
रुग्णालयामधील सुरक्षा, स्वच्छता, शवविच्छेदनगृह, बायोमेडिकल वेस्ट, औषध वितरण, रुग्णवाहिका, रक्तसाठा आदींची माहिती जाणून घेतली. रुग्णालय साफ आणि निटनेटके असले पाहिजे. रुग्णांना रुग्णालयात चांगल्या सुविधा, उपचार आणि औषधे मिळाली पाहिजे, अशा सूचना त्यांनी केल्या. यावेळी आरोग्य यंत्रणेचे अधिकारी व कर्मचारी, नागरिक उपस्थित होते.
०००