विधानसभा लक्षवेधी

शास्त्रीनगर रुग्णालयातील महिलेच्या मृत्यूप्रकरणी समितीच्या अहवालानंतर संबंधितांवर कारवाई – उद्योग मंत्री उदय सामंत

मुंबई, दि. 5 : कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात प्रसुतीसाठी एका 26 वर्षीय महिलेला 11 फेब्रुवारी 2025 रोजी दाखल करण्यात आले. प्रसुतीनंतर अंतर्गत रक्तस्त्राव होत असल्यामुळे महिलेवर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रियेनंतर महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी ठाणे जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. या समितीचा अहवाल आल्यानंतर संबंधितांवर कारवाई करण्यात येईल, असे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी विधानसभेत आज लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

सदस्य मोहन मते यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली होती.

लक्षवेधी सूचनांच्या उत्तरात अधिक माहिती देताना मंत्री सामंत म्हणाले, अशा प्रकरणी डॉक्टर किंवा रुग्णालय यांच्याकडून उपचारादरम्यान हलगर्जीपणा झाला आहे का? याबाबत तपासणी करण्यासाठी 26 मार्च 2010 च्या शासन निर्णय अन्वये जिल्हा शल्यचिकित्सक यांचे अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली आहे. त्यानुसार महानगरपालिकेमार्फत सदर प्रकरणाचे संपूर्ण चौकशी करण्यात येत आहे.

000

कंपनीतील दुर्घटनांसंदर्भात कायद्यात सुधारणा करणार – कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर

मुंबई, दि. 5 : कंपन्यांमध्ये होणाऱ्या दुर्घटनांसंदर्भात कामगारांच्या हितासाठी कामगार विभागाला अधिकाधिक अधिकार मिळावेत. यासाठी कायद्यात सुधारणा करणार असल्याचे कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

चंद्रपूर जिल्ह्यातील ताडाळी औद्योगिक वसाहतीत धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीत झालेल्या ऑपरेटरच्या मृत्यूप्रकरणी सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. या लक्षवेधी सूचनेच्या चर्चेत सदस्य सर्वश्री राजू तोडसाम, नाना पटोले, किशोर जोरगेवार, हिरामण खोसकर यांनी सहभाग घेतला.

कामगार मंत्री फुंडकर म्हणाले, कंपन्यांमध्ये दुर्घटना होऊन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यास, जखमी झाल्यास अशा दुर्घटनेमध्ये कामगार विभागाचे अधिकारी तेथे जाऊन याप्रकरणी तपासणी करतात. तपासणीअंती अहवाल सादर करतात. कामगार विभागाच्या माध्यमातून न्यायालयात खटला दाखल करता येतो. चंद्रपूर जिल्ह्यातील धारिवाल इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडमधील दुर्घटनेत मृत्यू झालेल्या ऑपरेटरच्या वारसाला कारखाना व्यवस्थापनाद्वारे सानुग्रह अनुदानाची 70 लक्ष रुपये रक्कम देण्यात आली आहे. तसेच मृत कामगाराच्या पत्नीला नोकरी देण्याबाबत, गट विमा व उपदानाची रक्कम लवकरात लवकर देण्याबाबत कार्यवाही करण्याचे कंपनी व्यवस्थापनाने कळविले आहे. याबाबत कार्यवाही न झाल्यास नियमानुसार संबंधितांवर कारवाई करण्यात येईल.

चंद्रपूर जिल्ह्यातील उद्योगांबाबत कामगार सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अधिवेशन संपल्यानंतर चंद्रपूर येथे आढावा घेण्यात येईल. सध्या अस्तित्वात असलेल्या कायद्यात सुधारणा किंवा नवीन कायदा करण्याबाबत विधी व न्याय विभागाकडे मार्गदर्शन मागण्यात आले आहे. मार्गदर्शन प्राप्त झाल्यानंतर याबाबत सकारात्मक कार्यवाही करण्यात येईल, असेही कामगार मंत्री फुंडकर यांनी सांगितले.

0000

निलेश तायडे/विसंअ/

जीबीएस आजाराबाबत व्यापक जनजागृती राज्यस्तरीय शीघ्र प्रतिसाद पथक स्थापन – सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

मुंबई, दि. 5 : गुईलेन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) आजाराबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाकडून व्यापक जनजागृती करण्यात येत आहे. हा आजार कोरोनासारखा संसर्गजन्य नसून शरीराची प्रतिकारशक्ती कमी झाल्यास होतो, असे आरोग्य तज्ज्ञांनी स्पष्ट केले आहे. या आजाराबाबत राज्यस्तरीय शीघ्र प्रतिसाद पथक स्थापन करण्यात आले असून मार्गदर्शक सूचना तयार करण्यात आल्या असल्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी विधानसभेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

‘जीबीएस’ आजाराबाबत सदस्य अतुल भातखळकर यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. यावेळी झालेल्या चर्चेत सदस्य भीमराव तापकीर, मनोज जामसुतकर,चेतन तुपे, सिद्धार्ध शिरोळे, नाना पटोले यांनीही सहभाग घेतला.

सार्वजनिक आरोग्य मंत्री श्री. आबिटकर म्हणाले, राज्यात पुणे जिल्ह्यात 9 जानेवारी 2025 रोजी पहिला जीबीएस चा संशयित रुग्ण आढळला. 3 मार्च 2025 पर्यंत 222 संशयीत रुग्णांची नोंद झाली असून यापैकी 193 रुग्णांचे निदान झाले आहे. सद्यस्थितीत जीबीएस रुग्णसंख्येत वाढ होत असल्याचे दिसून येत नाही. जीबीएस विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्गदर्शक सूचना तयार करण्यात आल्या आहेत. महात्मा फुले जन आरोग्य योजनेंतर्गत हा आजार समाविष्ट करण्यात आला असून गरजू रुग्णांवर मोफत उपचार करण्यात येत आहेत.

पुणे येथे नियमित सर्वेक्षण सुरू असून बाधित भागातील 89 हजार 514 घरांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे. मी स्वतः पुणे जिल्ह्यात भेट दिली आहे. बाधित भागातील विहिरीच्या पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. प्रभावित भागातील पाण्याचे क्लोरिनेशन करण्यात आले आहे. राज्यात विविध माध्यमांद्वारे या आजाराविषयी माहिती देण्यात येत असून, लक्षणे आढळल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन आरोग्य मंत्री श्री. आबिटकर यांनी केले.

*****

शैलजा पाटील/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *