नवी दिल्ली, २५ : गणेशोत्सवाला यंदा राज्य उत्सवाचा दर्जा मिळाल्याने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक उत्साहाला नवे वैभव प्राप्त झाले आहे. या पार्श्वभूमीवर दिल्लीतील महाराष्ट्र सदनात गणेशोत्सवासाठी उभारण्यात आलेल्या मंडपासह स्वयंसहाय्यता गटांच्या दालनाची पाहणी निवासी आयुक्त तथा सचिव. आर. विमला यांनी केली.
कोपर्निकस मार्गावरील महाराष्ट्र सदनात दहा दिवसीय स्वयंसहाय्यता गटांचे प्रदर्शनासह गणेशोत्सवाचे आयोजन उत्साहात होणार आहे. पाहणीवेळी सहाय्यक निवासी आयुक्त स्मिता शेलार, महाराष्ट्र परिचय केंद्राच्या प्रभारी उपसंचालक मनिषा पिंगळे आणि व्यवस्थापक प्रमोद कोलपते उपस्थित होते.
या वेळी आर. विमला यांनी मंडप व स्वयंसहाय्यता गटांच्या दालनाच्या सजावटीत पर्यावरणस्नेही साहित्याचा वापर करण्यावर भर दिला. गणपती मूर्तीच्या स्थापनेच्या जागेची सुरक्षिततेची काळजी, अग्निशमन व विद्युत यंत्रणेची योग्य व्यवस्था तसेच पावसाळी वातावरण लक्षात घेऊन जलरोधक ताडपत्री व पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक सुविधा करण्याच्या महत्त्वपूर्ण सूचना त्यांनी दिल्या.
गणेशोत्सव आणि स्वयंसहाय्यता गटांचा अनोखा संगम
महाराष्ट्र सदनात दरवर्षी गणपती बाप्पाचे स्वागत उत्साहपूर्ण वातावरणात केले जाते. यंदा नाशिक, बीड आणि पालघर जिल्ह्यातील स्वयंसहाय्यता गट तसेच स्थानिक कारागीर आपल्या हस्तकौशल्याची जादू सादर करणार आहेत.
दालनात खादी, बटिक, बांधणी, वारली चित्रकला, चामड्याची उत्पादने, दागिने आणि पारंपरिक खाद्यपदार्थांचे प्रदर्शन भाविकांना आकर्षित करणार आहे. विशेष म्हणजे, लाइव्ह किचनद्वारे ताज्या खाद्यपदार्थांची निर्मिती आणि आस्वाद घेण्याची सुविधा उपलब्ध असणार आहे. त्यामुळे भाविकांना महाराष्ट्राच्या समृद्ध खाद्यसंस्कृतीचा थेट अनुभव घेता येणार आहे. हा उपक्रम महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वैभवाचा आणि ग्रामीण उद्योजकतेचा अनोखा संगम घडवून गणेशोत्सवाला अविस्मरणीय स्वरूप देणार आहे.
0000