मंत्रालयात ५ ते ९ मे दरम्यान “टेक वारी – महाराष्ट्र टेक लर्निंग वीक”  विशेष प्रशिक्षण कार्यक्रम- अपर मुख्य सचिव व्ही राधा

मुंबई, दि. २१ : नागरी सेवा दिनाचे २१ एप्रिल औचित्य साधून महाराष्ट्रातील प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी यांच्या कौशल्य विकासासाठी प्रशिक्षण संस्कृती निर्माण करणे तसेच मुख्यमंत्री महोदयांना १०० दिवसाच्या कार्यक्रमांतर्गत केंद्र शासनाच्या iGOT प्रणालीवर तीन महिन्यात ९ हजारावरून ५ लाख कर्मचा-यांची नोंदणी करण्यात आलेल्या सर्वांना आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख करून देणे. यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे “महाराष्ट्र टेक लर्निंग वीक – टेक वारी” हा विशेष प्रशिक्षण कार्यक्रम दि. ५ मे ते ९ मे २०२५ दरम्यान मंत्रालय, मुंबई येथे आयोजित करण्यात आला असल्याचे सामान्य प्रशासन विभागाच्या अपर मुख्य सचिव व्ही. राधा यांनी सांगितले.

श्रीमती राधा यासंदर्भात म्हणाल्या, कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ब्लॉकचेन, इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT), सायबर सुरक्षा अशा तंत्रज्ञान विषयांवर तज्ज्ञांचे सत्र, कार्यशाळा व विचारमंथनाच्या माध्यमातून शासकीय कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा उद्देश फक्त तंत्रज्ञानाचे ज्ञान देणे नसून, मानसिक व शारीरिक आरोग्य संवर्धन, तणाव व्यवस्थापन आणि सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणे हाही आहे.

उद्घाटन कार्यक्रम सोमवार, दि. ५ मे रोजी सकाळी त्रिमूर्ती प्रांगणात होणार असून, विशेष सत्र मंगळवार, दि. ६ मे रोजी मंत्रालयाच्या सहाव्या मजल्यावरील परिषद सभागृहात आयोजित करण्यात आले आहे. या सत्रात केंद्र शासनाच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे सचिव “डिजिटल परिवर्तन व प्रशासनातील नवप्रवर्तन” या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत.

मंत्रालयातील सर्व अधिकारी-कर्मचारी तसेच जिल्हास्तरावरील प्रतिनिधींसाठी प्रत्येक दिवशी तंत्रज्ञान सत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, दररोज एक प्रमुख सन्माननीय व्यक्ती तंत्रज्ञानविषयक व्याख्यान देणार आहेत.हा उपक्रम महाराष्ट्र शासनाच्या डिजिटल युगात पुढे जाण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

००००

संध्या गरवारे/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *