उन्हाळ्यात जनावरांना होणारी विषबाधा आणि उपाययोजना

उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ होत असल्याने जनावरांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होतो. या काळात जनावरांमध्ये उष्माघात, पाण्याची कमतरता, पचनाचे विकार यांसह विषबाधेच्या घटनाही वाढताना दिसतात. विषबाधा ही गंभीर समस्या असून वेळेवर उपचार न झाल्यास जनावरांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शेतकरी व पशुपालकांनी या विषयाबाबत जागरूक राहणे अत्यंत आवश्यक आहे.

विषबाधा होण्याची प्रमुख कारणे : उन्हाळ्यात चाऱ्याची टंचाई निर्माण झाल्यामुळे जनावरे अनेकदा उपलब्ध असलेली कोणतीही वनस्पती खातात. यामध्ये धोतरा, आकोडा, करट, रानमेथी यांसारख्या विषारी वनस्पतींचा समावेश असू शकतो. अशा वनस्पतींचे सेवन केल्यास जनावरांना विषबाधा होण्याची शक्यता वाढते. याशिवाय शेतात फवारणी केलेल्या चाऱ्यावर राहिलेले कीटकनाशकांचे अंश, रासायनिक खते किंवा औद्योगिक रसायनांचा संपर्क हे देखील विषबाधेचे महत्त्वाचे कारण आहे. काही वेळा कुजलेला किंवा बुरशी लागलेला चारा जनावरांना दिला जातो. अशा चाऱ्यातून तयार होणारे विषारी घटक जनावरांच्या शरीरात जाऊन गंभीर परिणाम करतात.

प्लास्टिक, कचरा, तेलकट पदार्थ किंवा रंगयुक्त वस्तू खाल्ल्याने जनावरांच्या पचनसंस्थेवर परिणाम होतो. तसेच औषधांचा अति प्रमाणात किंवा चुकीच्या पद्धतीने वापर केल्यासही विषबाधा होऊ शकते.

विषबाधेची लक्षणे : विषबाधा झाल्यानंतर जनावरांमध्ये काही ठळक लक्षणे दिसून येतात. भूक मंदावणे किंवा पूर्णपणे बंद होणे, तोंडातून फेस येणे, लाळ गळणे, बेचैनी, इकडे-तिकडे धावणे, श्वास घेण्यास त्रास होणे, पोट फुगणे किंवा जुलाब होणे अशी लक्षणे सामान्यतः दिसतात. गंभीर अवस्थेत स्नायूंमध्ये कंप सुटणे, डोळे फिरणे किंवा अचानक मृत्यू होण्याची शक्यता देखील असते. त्यामुळे अशी लक्षणे दिसताच त्वरित उपाययोजना करणे आवश्यक आहे.

तात्काळ उपाययोजना : विषबाधा झाल्याचा संशय आल्यास सर्वप्रथम जनावराला विषारी पदार्थांपासून दूर करावे. तोंडामध्ये उरलेले विषारी पदार्थ काढून टाकावेत आणि स्वच्छ, थंड पाणी पाजावे. कोणतेही घरगुती उपाय किंवा औषधे स्वतःहून देऊ नयेत. तातडीने जवळच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधून योग्य उपचार घ्यावेत. वेळेवर उपचार मिळाल्यास जनावराचा जीव वाचविणे शक्य होते.

प्रतिबंधात्मक उपाय : विषबाधा टाळण्यासाठी शेतकरी व पशुपालकांनी काही गोष्टींची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. जनावरांना देण्यात येणारा चारा व खाद्यपदार्थ स्वच्छ व दर्जेदार असावा. कीटकनाशके आणि रसायने सुरक्षित ठिकाणी ठेवावीत. शेतातील विषारी वनस्पती ओळखून त्या नष्ट कराव्यात. जनावरांच्या गोठ्याभोवती स्वच्छता राखणे, नियमित पशुवैद्यकीय तपासणी करणे आणि पुरेसे स्वच्छ पाणी उपलब्ध करून देणेही महत्त्वाचे आहे.

उन्हाळ्यात जनावरांची योग्य काळजी घेतल्यास विषबाधेचा धोका मोठ्या प्रमाणात कमी करता येतो. शेतकऱ्यांनी जागरूक राहून प्रतिबंधात्मक उपाय अमलात आणल्यास जनावरांचे आरोग्य चांगले राहून आर्थिक नुकसान टाळता येऊ शकते. जनावरे ही शेतकऱ्यांची महत्त्वाची संपत्ती असल्याने त्यांचे संरक्षण करणे ही प्रत्येक पशुपालकाची जबाबदारी आहे.

 

जिल्हा माहिती कार्यालय, बुलढाणा

0000

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *