माणगाव परिषद : सामाजिक क्रांतीचा एल्गार

भारतीय समाजव्यवस्थेतील जातीभेदाच्या भिंती पाडण्यासाठी आणि शोषित-वंचितांना आत्मभान मिळवून देण्यासाठी ज्या काही मोजक्या ऐतिहासिक घटना घडल्या, त्यात ‘माणगाव परिषद’ हे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. 21 आणि 22 मार्च 1920 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील तत्कालीन कागल संस्थानातील माणगाव या छोट्याशा गावात ही परिषद संपन्न झाली. या परिषदेला आता 106 वर्षे पूर्ण होत आहेत. ही परिषद केवळ एक राजकीय सभा नव्हती, तर ती भारतीय लोकशाहीच्या आणि सामाजिक समतेच्या प्रवासातील एक अत्यंत महत्त्वाचा टप्पा होता आणि तो पुढे एक सामाजिक क्रांतीचा एल्गार ठरला.

 दोन युगपुरुष एकाच मंचावर : शाहू महाराज आणि डॉ. आंबेडकर

माणगाव परिषदेचे सर्वात ऐतिहासिक आणि रोमांचक वैशिष्ट्य म्हणजे राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन युगपुरुषांचे एकाच मंचावर येणे. त्यावेळी डॉ. आंबेडकर हे अवघ्या 29 वर्षांचे तरुण होते आणि नुकतेच विदेशातून उच्च शिक्षण घेऊन परतले होते. राजर्षी शाहू महाराजांनी त्यांच्यातील अफाट बुद्धिमत्ता, तळमळ आणि नेतृत्वगुण ओळखले होते. महाराजांनी स्वतः पुढाकार घेऊन डॉ. आंबेडकरांना या परिषदेचे अध्यक्षस्थान भूषवण्याची विनंती केली. एका बाजूला सत्तेचा आणि अधिकाराचा वापर लोककल्याणासाठी करणारे ‘लोकराजा’ आणि दुसऱ्या बाजूला पददलितांचे कैवारी बनलेले ‘विद्वान’ बाबासाहेब, असा हा अभूतपूर्व संगम होता.

ऐतिहासिक भविष्यवाणी आणि नेतृत्वाचा उदय

या परिषदेत राजर्षी शाहू महाराजांनी केलेले भाषण भारतीय इतिहासात अजरामर झाले आहे. महाराजांनी उपस्थितांना संबोधित करताना म्हटले होते, तुम्हाला तुमचा नेता (डॉ. आंबेडकर) मिळाला आहे. माझी खात्री आहे की, ते केवळ तुमचेच नव्हे तर संपूर्ण भारताचे नेते होतील. ही केवळ स्तुती नव्हती, तर एका द्रष्ट्या राजाने भविष्यातील महामानवावर ठेवलेला विश्वास होता. शाहू महाराजांनी जाहीरपणे डॉ. आंबेडकरांचे नेतृत्व मान्य केले आणि समाजाला त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन केले. या एका वाक्याने डॉ. आंबेडकरांच्या नेतृत्वावर अधिकृत शिक्कामोर्तब झाले आणि इथूनच एका नव्या पर्वाची सुरुवात झाली.

परिषदेचे ठराव आणि सामाजिक परिणाम

माणगाव परिषदेत केवळ भाषणे झाली नाहीत, तर सामाजिक परिवर्तनासाठी ठोस ठराव मंजूर करण्यात आले. त्यात प्रामुख्याने खालील बाबींचा समावेश होता:

अस्पृश्यता निवारण: समाजात रुजलेली अस्पृश्यतेची अनिष्ट प्रथा मुळापासून उपटून टाकणे.
शिक्षण प्रसार: शोषित वर्गातील मुला-मुलींना दर्जेदार शिक्षण मिळवून देणे, कारण शिक्षण हेच प्रगतीचे साधन आहे.
राजकीय अधिकार: दलितांना विधिमंडळात आणि प्रशासनात योग्य प्रतिनिधित्व मिळावे, यासाठी मागणी करणे.
स्वाभिमानाची जागृती: ‘बहिष्कृत’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समाजाने स्वतःचा न्यूनगंड सोडून देऊन आत्मसन्मानाने जगण्यास शिकणे.

या परिषदेने डॉ. आंबेडकरांच्या ‘मूकनायक’ या वृत्तपत्रासाठी देखील मोठे बळ दिले. शाहू महाराजांनी या वृत्तपत्राला आर्थिक मदत केली होती, जेणेकरून वंचितांचा आवाज सरकारपर्यंत पोहोचू शकेल.

माणगाव : एक सन्मानभूमी

आज माणगाव (ता. हातकणंगले) ही भूमी ‘सन्मानभूमी’ म्हणून ओळखली जाते. दरवर्षी वर्धापन दिनाचे औचित्य साधून सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग आणि ‘बार्टी’ (BARTI) पुणे यांच्या वतीने भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. यावर्षी 21 मार्च रोजी ‘क्रांतीचा साक्षीदार’ हे एकपात्री नाटक, विविध मान्यवरांची व्याख्याने आणि 22 मार्च रोजी प्रसिद्ध गायक उत्कर्ष शिंदे व कबीर नाईकनवरे यांचा प्रबोधनपर सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. ही आयोजने केवळ उत्सवी नसून, नव्या पिढीला महापुरुषांच्या विचारांची ओळख करून देण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहेत.

माणगाव परिषद ही समतेची, बंधुत्वाची आणि न्यायाची सुरुवात होती. या परिषदेने शिकवले की, जेव्हा सत्ता (शाहू महाराज) आणि ज्ञान (डॉ. आंबेडकर) एकत्र येतात, तेव्हा मोठी क्रांती घडते. आज 106 वर्षांनंतरही जातीभेदाची आव्हाने आपल्यासमोर आहेत. अशा वेळी माणगाव परिषदेचा हा वारसा आपल्याला प्रेरणा देतो. महापुरुषांच्या विचारांना केवळ अभिवादन न करता, ते आचरणात आणणे हीच या ऐतिहासिक दिनाची खरी फलश्रुती ठरेल.

०००००००

सचिन अडसूळ,

जिल्हा माहिती अधिकारी, कोल्हापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *