प्रशासनाने संवेदनशीलतेने भटक्या, विमुक्त घटकांना योजनांचा लाभ द्यावा – पालकमंत्री चंद्रकांत पाटील

सांगली, दि. ३० (जिमाका) : समाजातील भटक्या व विमुक्त जातीतील नागरिकांना जातीचे दाखले देण्याची प्रक्रिया क्लिष्ट असते. मात्र, अशा समाजातील घटकांना जातीचे दाखले देऊन जिल्हा प्रशासनाने संवेदनशीलता दाखवली आहे. याच संवेदनशीलतेने त्यांनी या घटकांना विविध शासकीय योजनांचा लाभ द्यावा, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण, संसदीय कार्य मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले.

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानांतर्गत विविध दाखले वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृह येथे झालेल्या या कार्यक्रमास आमदार सुधीर गाडगीळ, जिल्हाधिकारी अशोक काकडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. स्नेहल कनिचे, उपविभागीय अधिकारी मिरज उत्तम दिघे, जिल्हा पुरवठा अधिकारी आशिष फुलुके, मिरज तहसीलदार डॉ. अपर्णा मोरे-धुमाळ, सांगली अप्परच्या तहसीलदार अश्विनी वरुटे, जयश्री पाटील आदि उपस्थित होते.

पालकमंत्री पाटील म्हणाले, भटक्या व विमुक्त जातीतील नागरिकांपर्यंत शासकीय योजना पोहोचण्याची गरज असून, यासाठी एमएसडब्ल्यूच्या विद्यार्थ्यांचे सहाय्य घ्यावे. तसेच, प्रशासनावर केवळ अवलंबून न राहता संबंधित समाजातील नागरिकांनीही या योजना गरजू व वंचितांपर्यंत पोहोचवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी पालकमंत्री पाटील यांच्या हस्ते मिरज तालुक्यातील वड्डी, बोलवाड, मिरज आणि सुभाषनगर (मिरज) येथील लाभार्थींना जातीच्या दाखल्यांचे वाटप करण्यात आले.

तसेच लक्ष्मी मुक्ती योजना अंतर्गत मिरज तालुक्यातील सलगरे येथील तानाजी महादेव पाटील व त्यांच्या पत्नी जयश्री तानाजी पाटील यांना तसेच एरंडोली येथील गुंडाप्पा नेमगोंडा पाटील व त्यांच्या पत्नी अनिता गुंडाप्पा पाटील यांना सात बारा वाटप करण्यात आले. सांगली व मिरजेतील मदारी, मांग गारूडी, बेरड, नंदीवाले समाजातील 35 लाभार्थींना जातीच्या दाखल्यांचे वितरण करण्यात आले. तसेच अंत्योदय योजनेतील 15 दिव्यांग व 2 दुर्धर आजारी लाभार्थींना ई- शिधा पत्रिका वाटप करण्यात आले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी तहसीलदार अमोल कुंभार, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी रूपाली सोळंके व त्यांच्या टीमने मेहनत घेतली. प्रारंभी रा. हि. भिडे मूकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी सांकेतिक भाषेत राष्ट्रगीत सादर केले. सूत्रसंचालन अमोल कुंभार यांनी केले.

०००

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *