महाराष्ट्र सागरी मंडळाच्या अद्ययावतीकरणासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी एकत्रित काम करावे – मंत्री नितेश राणे

मुंबई, दि. १६ : महाराष्ट्र सागरी मंडळातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मंडळाच्या अद्ययावतीकरण व महसूल वाढीसाठी एकत्रित काम करावे, असे  आवाहन मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी केले. मंत्री राणे यांच्या पाठपुराव्यास यश येऊन सागरी मंडळाच्या कर्मचाऱ्यांना भविष्य निर्वाह निधी लागू करण्यात आला आहे. यासाठी महाराष्ट्र सागरी मंडळाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या हस्ते मंत्रालयात मंत्री राणे यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी मंत्री राणे बोलत होते.

यावेळी सागरी मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप, प्रशासकीय अधिकारी प्रदीप बढीये, कॅप्टन खारा यांच्यासह सागरी मंडळाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. शाल, श्रीफळ आणि जहाजाची प्रतिकृती देऊन मंत्री राणे यांचा सत्कार करण्यात आला.

सागरी मंडळातील सर्वच कर्मचाऱ्यांना या निर्णयाचा फायदा झाल्याचे सांगून मंत्री राणे म्हणाले की, विभागाचा मंत्री म्हणून कर्मचाऱ्यांचा नेहमीच विचार केला आहे. कर्मचाऱ्यांनीही मंडळामार्फत राबवण्यात येत असलेल्या योजना तसेच नवनवीन प्रकल्प लवकर पूर्ण करण्यासाठी काम करावे. सर्वांनी एकत्रित काम केल्यास मंडळाचा महसूल वाढवण्याचे ध्येय लवकर साध्य करता येईल.

०००

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *