मुंबई, दि. २० : रायगड जिल्ह्यातील स्थानिक बेरोजगार युवकांना सुरक्षा रक्षक पदावर रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याची आवश्यकता आहे. संबंधित अधिकाऱ्यांनी तपासणी प्रक्रिया अधिक प्रभावी करावी. सुरक्षा रक्षकांच्या नोंदणीपासून आस्थापनांच्या तपासणीपर्यंतची सर्व कामे कालबद्ध पद्धतीने पूर्ण करावीत. महिन्याच्या कालावधीत याबाबत कार्यवाही पूर्ण व्हावी, असे निर्देश, कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी दिले.
नरिमन भवन येथे रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या वतीने नोंदणीकृत तरुणांना रोजगार उपलब्ध करून देताना येणाऱ्या अडचणींबाबत दूरदृश्य प्रणालीद्वारे आढावा बैठक घेण्यात आली. बैठकीला विधान परिषद आमदार विक्रांत पाटील तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
कामगार विभागाचे प्रधान सचिव आय. ए. कुंदन, कामगार आयुक्त एच. पी. तुम्मौड, उपसचिव स्वप्नील कापडणीस आदी बैठकीला प्रत्यक्ष उपस्थित होते.
सुरक्षा रक्षकांची नियुक्ती, आस्थापनांची नोंदणी आणि खासगी संस्थांवर नियंत्रण ठेवणे ही मंडळाची मुख्य जबाबदारी आहे. ही कामे नियमित आणि प्रभावीपणे झाली पाहिजेत. लोकप्रतिनिधी आणि स्थानिक प्रशासनाचे सहकार्य मिळाल्यास संबंधित आस्थापनांवर आवश्यक नियंत्रण आणणे शक्य होईल, असेही मंत्री ॲड फुंडकर यांनी स्पष्ट केले.
रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या कार्यक्षेत्रातील विविध आस्थापनांमध्ये बृहन्मुंबई व ठाणे जिल्ह्यातील सुमारे २५० सुरक्षा रक्षक कार्यरत असल्याने रायगडमधील स्थानिक युवक रोजगाराच्या संधींपासून वंचित आहेत. सध्या रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळाच्या प्रतीक्षा यादीवर २ हजार ५३१ सुरक्षा रक्षक असून, त्यांच्या नियुक्तीद्वारे स्थानिक युवकांना मोठ्या प्रमाणावर रोजगार उपलब्ध होऊ शकतो, असा अभिप्राय मंडळाने व्यक्त केला.
याबाबत ठाणे आणि रायगड जिल्हा सुरक्षा रक्षक मंडळातील अधिकाऱ्यांनी संयुक्त बैठक घेऊन तातडीने निर्णय घ्यावा, असे निर्देशही कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी दिले.
000000
माहिनी राणे/स.सं