सेवाकार्यात जैन समाजाचे योगदान मोलाचे – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई दि ३१:- भगवान महावीरांनी शांतीचा आणि सेवाभावाचा मार्ग दाखविला. सेवाकार्यात नेहमीच अग्रेसर राहून जैन समाजाने आदर्श निर्माण केला असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

बोरीवली पश्चिम येथील कोरा केंद्र मैदान येथे सकल जैन समाज यांच्या वतीने भगवान महावीर जन्मकल्याणक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा, महापौर रितू तावडे, आमदार पराग शहा, अमित साटम, संजय उपाध्याय, गुरुदेव नम्र मुनी तसेच मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, देशाच्या प्रगतीत जैन समाजाचे योगदान मोलाचे आहे. गोसेवा आणि सेवाकार्यातही जैन समाज अग्रेसर आहे. भगवान महावीर यांनी दाखवलेला मार्ग मानवतेच्या कल्याणाचा असून या विचारांतूनच विश्व कल्याण साधले जाऊ शकते.

तीर्थंकरांचे विचार सर्वांना सोबत घेवून जाणारे आहेत. समाजाच्या वतीने साकारण्यात येणारी प्राणी रुग्णालयाची संकल्पना भूतदया अधोरेखित करणारी आहे. वारकरी परंपरेशी घट्ट नाळ जोडलेल्या मुंबईतील डबेवाले यांना ई-बाईक्स वितरणाचा उपक्रमही अतिशय स्तुत्य असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, भगवान महावीर यांनी अहिंसेचा संदेश दिला. अखिल मानवतेसाठी त्यांनी मार्ग दाखविला. या मार्गाचे अनुसरण सर्वांनी करण्याची गरज असल्याचे उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.

कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले, जैन समाज हा भारतीय समाज-संस्कृतीचा अविभाज्य भाग आहे.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी सर्वांनी एकत्र येणे गरजेचे असल्याचे श्री लोढा यांनी सांगितले.

महापौर रितू तावडे म्हणाल्या, भगवान महावीर यांचा शांतीचा संदेश आजच्या परिस्थितीत अत्यंत महत्त्वाचा आहे.

यावेळी मान्यवरांच्या हस्ते अरहम प्राणी रुग्णालयाच्या संकल्पनेचे उद्घाटन तसेच मुंबईतील डबेवाले यांना 108 ई बाईक्सचे वितरण करण्यात आले. दिव्यांगांना 50 ई ट्रायसिकलचे वितरणही यावेळी करण्यात आले.
———-000———-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *