कराड -चिपळूण दरम्यान वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तातडीने उपायोजना करा – पालकमंत्री शंभूराज देसाई

सातारा, दि.२७: कराड -चिपळूण दरम्यान वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तातडीने उपायोजना करा. या मार्गात असलेली अतिक्रमणे काढून टाकण्याच्या दृष्टीने स्थानिक पातळीवर प्रशासनाने उपाययोजना कराव्यात, असे निर्देश पर्यटन मंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

मुंबई येथून शासकीय निवासस्थानाहून दूरदृष्य प्रणालीद्वारे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत मंत्री श्री. देसाई बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी संतोष पाटील, दूरदृष्य प्रणालीद्वारे पोलीस अधीक्षक तुषार दोषी, पाटणचे उपविभागीय अधिकारी सोपान टोम्पे, पोलीस उपाधीक्षक विजय पाटील, राष्ट्रीय महामार्ग पुणेचे अधीक्षक अभियंता दयानंद विभुते, तहसीलदार अनंत गुरव, राष्ट्रीय महामार्गच्या कार्यकारी अभियंता श्रुती नाईक  यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

कराड-चिपळूण महामार्गावरील राडा-रोडा प्राधान्याने काढावा, अशा सूचना करुन पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, या मार्गावरील वाहतुक सुरळीत व अपघात होणार नाहीत यासाठी प्राधान्याने खड्डे बुजवावेत. पावसामुळे महामार्गावर पाणी साठणार नाही यासाठी उपाययोजना कराव्यात. रस्त्या शेजारी साईड पट्ट्या खचल्या आहेत अशा ठिकाणी त्या पहिल्यांदा भरुन घ्याव्यात. हे काम येत्या आठ दिवसात करावे, असे निर्देश देऊन प्रांत, तहसीलदार व पोलीस विभागातील अधिकाऱ्यांनी कराड-चिपळून मार्गाची पाहणी करुन आणखीन करावयाच्या उपयोजना सुचवण्यात, असे निर्देशही पालकमंत्री श्री. देसाई यांनी दिले.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *