सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातून खुंदलापूरसह परिसरातील गावे वगळण्याबाबत प्रस्ताव सादर करा – मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि. १४ : सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील खुंदलापूर येथील जमिनीवरील फेरफार क्रमांक ४६५ वरील भूसंपादनाचे शेरे कमी करण्याबाबत वन विभागाने सह्याद्री व्याघ्र प्रकल्पातून ही गावे वगळण्याबाबत प्रस्ताव सादर करावा, असे निर्देश महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले.

मंत्री बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील समिती कक्षामध्ये सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्यातील खुंदलापूर येथील जमिनीवरील फेरफार क्रमांक ४६५ वरील भूसंपादनाचे शेरे कमी करण्याबाबत आयोजित बैठकीत मंत्री बावनकुळे बोलत होते. बैठकीस शिराळा मतदारसंघाचे आमदार सत्यजित देशमुख, महसूल विभागाचे अवर सचिव (भूसंपादन) डॉ. वसंत माने, उपसचिव नितिन खेडेकर, कोल्हापूर वनपरिक्षेत्राचे मुख्य वनसंरक्षक रामानुजम उपस्थित होते. तसेच सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अशोक काकडे हे दूरदृश्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते.

मंत्री बावनकुळे म्हणाले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र राज्य वन्यजीव मंडळाची २४ व्या बैठकीत चांदोली राष्ट्रीय उद्यानातील जनाईवाडी येथील गावकऱ्यांच्या सात-बारा वरील वनविभागाचे संपादन शेरे कमी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. वन विभागाकडून आलेल्या प्रस्ताव राष्ट्रीय वन्यजीव प्रकल्प यांच्याकडे पाठवण्यात येईल.

खुंदलापूरसह जनाईवाडी, धनगरवाडी गावातील भूसंपादनाचे शेरे कमी झाल्यास या गावातील नागरिकाना शासनाच्या योजनांचा लाभ मिळणार आहे. या गावातील भूसंपादनाचे शेरे 1997 पासून आहेत, ते वगळण्यासाठी तात्काळ प्रस्ताव पाठवावा, असे निर्देश मंत्री बावनकुळे यांनी दिले.

०००

गजानन पाटील/ससं/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *