संपावर तोडगा काढून कामगारांना त्वरित कामावर घ्यावे – कामगार मंत्री आकाश फुंडकर

मुंबई, दि. १२: टेक्नोक्राफ्ट इंडस्ट्रीज इंडिया लिमिटेड (धानिवली, ता. मुरबाड, जि. ठाणे) या कंपनीच्या  गारमेंट विभागातील कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या संपावर कंपनी व्यवस्थापनाने तोडगा काढून निलंबित कामगारांना कामावर घ्यावे. तसेच या परिसरात शांतता ठेवावी, असे निर्देश कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर यांनी दिले.

या कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांबाबत मंत्रालयात बैठक झाली. बैठकीत कामगार मंत्री श्री. फुंडकर बोलत होते.

बैठकीस मुरबाडचे आमदार किसन कथोरे, कामगार विभागाच्या अपर मुख्य सचिव आय. ए. कुंदन, कामगार आयुक्त एच. पी तुम्मोड, उप कामगार आयुक्त संभाजी वनाळकर अपर कामगार आयुक्त भगवान आंधळे, सहाय्यक कामगार आयुक्त अनघा क्षीरसागर,  कंपनीचे संचालक सुदर्शन सराफ उपस्थित होते.

RAVI JADHAV

कामगार मंत्री ॲड आकाश फुंडकर म्हणाले, टेक्नोक्राफ्ट कंपनीच्या गारमेंट विभागातील कर्मचारी मागील १ डिसेंबर २०२५ पासून संपावर आहे. याबाबत तोडगा काढणे आवश्यक असून. कर्मचाऱ्यांच्या मागण्या लक्षात घेता मागण्या पूर्ण करण्यासाठी मानवीयदृष्टीने कार्यवाही करण्याची गरज आहे. अशा परिस्थितीत कामगार व कंपनी हिताचा सुवर्णमध्य साधत कंपनी संचालक मंडळाने सकारात्मक निर्णय घ्यावेत. कायम व कंत्राटी कामगारांच्या अडचणी समजून घेत, त्या यशस्वीपणे सोडविण्यात याव्यात.

निलंबित कामगारांना सेवेत घेतल्यानंतर कामगारांनी संप मागे घ्यावा. तसेच आंदोलनही मागे घ्यावे, असे आवाहनही यावेळी कामगार मंत्री फुंडकर यांनी केले.

००००

नीलेश तायडे/वि.सं.अ

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *