महामार्गांसह सर्वच नागरी क्षेत्रामध्ये स्वच्छ शौचालये सर्वांची जबाबदारी – सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई, दि. 4 : राज्यातील सर्व महामार्गावरील धाबे, हॉटेल, मॉल या ठिकाणांसह सर्व सार्वजनिक शौचालये स्वच्छ आणि सुस्थितीत असणे ही सर्वच विभागांची जबाबदारी असून त्यासाठी सर्वांनीच दक्ष असले पाहिजे, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री (सार्वजनिक उपक्रम वगळुन) शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी सांगितले.

महिला शौचालयांसंदर्भात मंत्रालयात झालेल्या बैठकीस आमदार चित्रा वाघ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव संजय दशपुते, राज्य परिवहन महामंडळाचे महा व्यवस्थापक दिनेश महाजन, नगर विकास विभागाचे उपसचिव अनिरुद्ध जेवळीकर यांच्यासह महिला बाल विकास विभाग, ग्रामविकास विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

महामार्गालगत शौचालयांची विशेषतः महिलांसाठीच्या शौचालयाची व्यवस्था चांगली असणे गरजेचे असल्याचे सांगून सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले म्हणाले की, महिला शौचालयांच्या स्वच्छतेबाबत आणि अन्य तक्रारीसंदर्भात क्युआर प्रणाली विकसित करण्याविषयी आराखडा तयार करावा. क्युआर कोडच्या माध्यमातून प्राप्त तक्रारींवर संबंधित विभागस्तरावरील अधिकारी तातडीने कारवाई करतील. महामार्गावर उभारण्यात आलेल्या शौचालयांच्या देखभाल दुरुस्तीचा प्रश्न निर्माण होतो. सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत सीएसआरच्या माध्यमातून 400 शौचालये उभारण्यात येणार आहेत. महिला बाल विकास विभागामार्फत या शौचालयांचे व्यवस्थापन करण्यात येणार आहे. शौचालयांमध्ये चांगल्या प्रकारचे एक्झॉस्ट फॅन पाण्याची व्यवस्था, सॅनिटरी पॅड व्हेंडिग मशिन्स बसवणे यासारख्या सुविधांही उपलब्ध करुन देण्यात यावी, अशा सूचनाही सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले यांनी दिल्या.

महामार्गालगत असलेल्या पेट्रोलपंपावर पुढील बाजूस शौचालय उभारण्याचा नियम करण्यात आला आहे. त्याशिवाय त्यांना परवानगी देण्यात येणार नसल्याचे सांगून सार्वजनिक बांधकाम मंत्री भोसले म्हणाले की, सार्वजनिक शौचालयाविषयी नगरिकांमध्ये असलेले गैरसमज दूर करण्यासाठी चांगली शौचालये उभारावीत आणि त्याच्या देखभालीची व्यवस्थाही निर्माण करावी. शहरांमध्ये उभारण्यात येणाऱ्या शौचालयांचे चांगले डिझाईन स्वीकारुन त्यानुसार बांधकाम करावे. त्यामध्ये खेळती हवा असावी, समोर भिंत उभारावी. सध्या अस्तित्वात असलेल्या शौचालयांमध्ये अशा प्रकारे परिवर्तन करता येईल. सर्वच संबंधित विभागांनी शौचालयांच्या स्वच्छतेसाठी कडक उपाययोजना कराव्यात. शौचालयांच्या तपासणीसाठी पथकांची निर्मिती करावी. एसटी महामंडळाने त्यांच्या बसगाड्यांना दिलेल्या थांब्याच्या ठिकाणी शौचालये सुस्थितीत असल्याची वारंवार खात्री करावी.

राज्यात स्वच्छ भारत मिशन अंतर्गत 1 लाख 60 हजार शौचालये उभारण्यात येत आहेत.  यापैकी 83 हजार शौचालये ही महिलांसाठी असणार असल्याची माहिती देण्यात आली. तसेच समूह विकास अधिकारी यांच्यामार्फत शौचालयांची तपासणी करुन त्याच्या देखभालीचे मूल्यमापन करून एखाद्या ठिकाणी स्वच्छता होत नसल्यास संबंधित ठेकेदाराचा ठेका रद्द करण्याची कारवाई करण्याचे निर्देशही यावेळी देण्यात आले.

0000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *