मराठवाड्यातील अतिवृष्टीचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा

राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाला तातडीने मदत पुरवण्याचे, पुराच्या वेढ्यात अडकलेल्या नागरिकांची त्वरित सुटका करण्याचे निर्देश

ठाणे दि. २२ :- मराठवाड्यातील अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे लक्ष ठेवून असून, मराठवाड्यातील प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून संवाद साधून त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला. पुराच्या पाण्यात अडकून पडलेल्या नागरिकांना तातडीने मदत करून सुरक्षितस्थळी हलविण्याचे निर्देश त्यांनी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना दिले. तसेच उपमुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिव, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या प्रधान सचिव व संचालकांशी बोलून त्यांना सूचनाही दिल्या.

मराठवाड्यात सर्वत्र अतिवृष्टी झाल्याने जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. अशा परिस्थितीत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी पूर परिस्थितीचा आढावा घेऊन लोकांना तत्काळ मदत पुरवण्याचे निर्देश दिले आहेत. यावेळी बीड, धाराशिव, लातूर, परभणी आणि हिंगोली या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवरून  संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला.

दरमान धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील ढगपिंपरी गावातील नागरिक पूर परिस्थितीत अडकल्याचे त्यांना समजले. उपमुख्यमंत्री  शिंदे यांनी जिल्ह्याधिकाऱ्यांशी बोलून तत्काळ एनडीआरएफच्या मदतीने हेलिकॉप्टर पाठवून पुराच्या वेढ्यात अडकलेल्या नागरिकांना तातडीने एअरलिफ्ट करून सुरक्षितस्थळी नेण्याचे निर्देश दिले. तसेच कोणतीही मदत लागल्यास तत्काळ आपल्याशी संपर्क साधावा आणि वेळोवेळी पूर परिस्थितीची माहिती आपल्याला द्यावी असेही संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले.

0000

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *