सिंधुदुर्ग, दि. ०७ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 अंतर्गत आज पहिल्या टप्प्यात 1569 शेतकऱ्यांना 7 कोटी 77 लाख 98 हजार 644 रुपयांची कर्जमुक्ती मिळाली. याचे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर वर्ग करण्यात येत आहेत. मंत्रालय स्तरावर मुंबई येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झालेल्या कार्यक्रमावेळी पालकमंत्री नितेश राणे यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांचे आभार मानले. तसेच जिल्ह्यातील या योजनेंतर्गत येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी विनंती केली.
आतापर्यंत अपलोड केलेल्या 6499 शेतकऱ्यांपैकी पात्र 3708 शेतकऱ्यांपैकी 2295 शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केले, पैकी 1569 जणांना आज लाभ मिळाला. उर्वरीत शेतकऱ्यांनी आधार प्रमाणीकरण केल्यावर पुढील काळात कर्जमुक्ती देण्यात येणार आहे.या कर्जमुक्ती योजने अंतर्गत 169 शेतकरी मयत, 339 खातेधारक देवस्थान /कबुलायतदार प्रकरणांतील, 215 शेतकरी संमतीपत्रने वाटप तर इतर विविध कारणांमुळे 24 शेतकरी लाभापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. या सर्व प्रकरणांमुळे एकूण 747 शेतकऱ्यांच्या ऑनलाईन प्रक्रियेत अडचणी निर्माण झाल्या असून त्यांच्यासाठी शासनाने विशेष सवलत व अटी शिथिल करण्याची गरज असल्याची मागणी पालकमंत्री नितेश राणे यांनी केली. यासह फार्मर आइडी काढताना येणाऱ्या अडचणी, खावटी कर्ज पुरवठा बाबत देखील शेतकऱ्यांच्या कर्जमुक्ती बाबत त्यांना लाभ मिळावा अशी विनंती केली.
याशिवाय जिल्ह्यातील 230 कर्जधारकांच्या आधार प्रमाणीकरणासाठी आवश्यक असलेले आधार ऑथेंटिकेशन प्रलंबित आहे. या सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकही पात्र शेतकरी कर्जमुक्तीपासून वंचित राहू नये, यासाठी पालकमंत्री नितेश राणे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे विशेष मागणी केली आहे. जिल्ह्याच्या भौगोलिक व आर्थिक परिस्थितीचा विचार करून या प्रलंबित व तांत्रिक अडचणीतील प्रकरणांना दिलासा देण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
आज राज्यस्तरावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील 6.22 लाख पात्र शेतकऱ्यांना 5,029 कोटीं रुपयांचा लाभ वितरण करण्यात आला या कार्यक्रमात ते बोलत होते.
००००००