बांबू उद्योगाचे राष्ट्रीय उत्पादनात मोठे योगदान

मुंबई, दि. १८ : जागतिक बांबू दिनानिमित्त फिनिक्स फाऊंडेशन, लोदगा (लातूर) आणि मित्रा यांच्या संयुक्त विद्यमाने ‘जन, पर्यावरण व समृद्धीसाठी बांबू’ या घोषवाक्याखाली एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यशवंतराव चव्हाण केंद्र, मुंबईं येथे झालेल्या या कार्यक्रमामध्ये देशभरातील नामवंत तज्ज्ञांच्या सहभागाने विविध सत्रे आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमात बांबूच्या उपयोगाचे महत्त्व, पर्यावरण संरक्षणातील त्याचे योगदान तसेच शाश्वत विकासात बांबूची भूमिका यावर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. “बांबू आधारित उद्योग” या सत्रात उद्योजक नीरज मुथा, प्राध्यापक पराग नेमाडे, प्रोफेसर निर्मला आणि बांबू पेटंटधारक गणेश वर्मा यांनी सहभाग घेतला.

बांबू उद्योग हा स्टील उद्योगास पर्याय म्हणून पुढे येत असून बांबूमध्ये स्टिलला टक्कर देण्याची पूर्ण क्षमता आहे. बांबूचे १५०० हून अधिक उपयोग असून घरे तसेच पायाभूत विकास करताना बांबूचा उपयोग केला जात आहे. बांबूचा उपयोग घरामध्ये केला तर १०० वर्षे टिकून राहू शकतो. तथापि, बांबूचा वापर वातावरणात केला तर त्यावर रासायनिक आवरण लावल्यास बांबू अधिक काळ टिकू शकतो. बांबू पासून एक टॉवर तयार करण्यात आला असून त्यास प्रशस्तीपत्र सुद्धा मिळाले आहे. बांबूला काही ठिकाणी बल्ली असेही संबोधले जात असले तरी ते बाहू – बल्ली प्रमाणे असल्याचे गणेश वर्मा यांनी मत व्यक्त केले.

भारत हा बांबूचे सर्वात मोठ्या प्रमाणात आयात करणारा देश आहे. बांबूपासून सेल्युलोज आणि लिग्नीन मोठ्या प्रमाणात तयार करता येते. बांबूचा उपयोग रसायन उद्योगात मोठ्या प्रमाणात होत असल्याचे मत पराग नेमाडे यांनी व्यक्त केले.

ऋग्वेदामध्ये बांबूला कल्पवृक्ष म्हटले असल्याचे प्रोफेसर निर्मला यांनी सांगितले. बांबू हे बहुआयामी उत्पादन आहे. बांबूचा उपयोग वैद्यकीय क्षेत्रात मोठ्या प्रमाणात केला जात असून बांबू हे सुपर फूड आल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी लखनऊ येथे झालेल्या प्रदर्शनात नीरज मुथा यांच्या कारखान्यात तयार झालेले बांबू उत्पादन पाहिले. त्यानंतर मुथा यांचे बांबूपासून तयार झालेले फर्निचर नवीन संसदेत वापरण्यात आले आहे. मुंबई येथील राजभवन येथेही बांबू निर्मित उत्पादन वापरण्यात येत आहे. बांबूचा उपयोग फर्निचर, भिंती सजावट, दरवाजे, खिडक्या, फ्रेम आदींमध्ये करण्यात येत आहे. बांबू उद्योग सकल राष्ट्रीय उत्पादनात खूप मोठे योगदान देत असून याद्वारे ५० हजार प्रत्यक्ष आणि १.५ लाख अप्रत्यक्ष रोजगार निर्माण करत असल्याचे मत मुथा यांनी या सत्रात व्यक्त केले.

०००

संजय ओरके/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *