प्रगल्भ नेतृत्वामुळे महाराष्ट्राची प्रगती; विकसित भारतासाठी विकसित महाराष्ट्र आवश्यक : राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

अशोक सराफ, सुलेखनकार अच्युत पालव राज्यपालांच्या हस्ते सन्मानित; मनोहर जोशी व पंकज उधास मरणोपरांत सन्मानित

मुंबई, दि. 2 : समर्पित नेतृत्व लाभल्याशिवाय कोणतेही राज्य प्रगती करु शकत नही. सुदैवाने महाराष्ट्राला यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक यांच्यासारखे द्रष्टे व प्रगल्भ नेते लाभले. प्रगल्भ नेतृत्वामुळे महाराष्ट्राची प्रगती झाली. विकसित भारताचे लक्ष्य गाठण्यासाठी तसेच देशाला ५ ट्रीलियन डॉलर अर्थव्यवस्था बनविण्यासाठी महाराष्ट्राचे योगदान महत्वाचे आहे, असे प्रतिपादन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केले.

प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला जाहीर झालेल्या राज्यातील पद्म पुरस्कार व पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेत्यांचा अभिनंदन सोहळा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्या प्रमुख उपस्थितीत शुक्रवारी (दि. २ ) राजभवन मुंबई येथे झाला, त्यावेळी ते बोलत होते.

वसंतराव नाईक कृषि संशोधन व ग्रामीण विकास प्रतिष्ठानच्या वतीने या अभिनंदन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.

आपण संसद सदस्य असताना मनोहर जोशी हे लोकसभा अध्यक्ष होते. त्यावेळची लोकसभा तत्कालीन अध्यक्ष मनोहर जोशी यांनी अतिशय कुशलतेने चालवली तसेच सभागृहातील चर्चा खेळीमेळीच्या वातावरणात होतील हे सुनिश्चित केले असे राज्यपालांनी सांगितले.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नेतृत्व गुणांचा उल्लेख करताना राज्यपालांनी महाराज सच्चे धर्मनिरपेक्ष होते असे सांगितले. आपल्या धर्माचा अभिमान असावा परंतु इतर धर्मांचा तिरस्कार नको असे राज्यपालांनी नमूद केले.

यावेळी दिवंगत माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी व दिवंगत पार्श्वगायक पंकज उधास यांना मरणोपरांत पद्मभूषण जाहीर झाल्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते त्यांच्या कुटुंबियांचा सत्कार करण्यात आला. उन्मेष जोशी यांनी सन्मान स्वीकारला.

सुलेखनकार अच्युत पालव व अभिनेते अशोक सराफ यांना देखील राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. पंतप्रधान राष्ट्रीय बाल पुरस्कार विजेती – अमरावतीची करिना थापा हिला देखील राज्यपालांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

पद्मश्री प्राप्त सामाजिक कार्यकर्ते  चैत्राम पवार, बासरी वादक रोणू मजुमदार व प्रसिद्ध डॉक्टर विलास डांगरे यांच्या वतीने त्यांच्या कुटुंबीयांनी सत्कार स्वीकारला.

कार्यक्रमाला उद्योग व सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री इंद्रनील नाईक, वसंतराव नाईक प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र बारवाले,  प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष अविनाश नाईक,  विश्वस्त मुश्ताक अंतुले, आनंद पटवर्धन व अंजली नाईक पिरामल उपस्थित होते.

*****

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *