भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले – महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

मुंबई, दि. १२ – भटक्या, विमुक्त जमातींच्या प्रलंबित समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांना आवश्यक ती सर्व कागदपत्रे व दाखले मिळावेत, यासाठी राज्यभरातील सुमारे 937 वस्त्यांमध्ये विशेष वस्ती शिबिरे आयोजित करण्याचा निर्णय महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घेतला आहे. 28 ते 30 सप्टेंबर या कालावधीत ही शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. मंत्रालयातील त्यांच्या दालनात भटक्या, विमुक्त समाजाच्या समस्यांबाबत विशेष बैठक झाली. त्यावेळी महसूलमंत्र्यांनी हे आदेश दिले. या बैठकीला भटके विमुक्त विकास परिषदेचे अध्यक्ष उद्धव काळे यांच्यासह अन्य पदाधिकारी व विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता अभियानात विशेष शिबिरे

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या कालावधीत ‘राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता’ हे अभियान राबविले जाणार आहे. या पंधरवड्यात सलग तीन दिवस हे भटके विमुक्त समाजासाठी विशेषत्वाने राखीव ठेवण्यात आले आहेत. या तीन दिवसांत प्रशासनाने त्यांच्या वस्तीवर जाऊन काम करावे, असे निर्देश देण्यात आले आहेत. या संपूर्ण मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी राज्य शासनाकडून लवकरच एक नवीन शासन निर्णय काढण्यात येणार आहे. या शासन निर्णयाच्या आधारे राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी आपापल्या जिल्ह्यांचा कृती आणि नियोजन आराखडा त्वरित तयार करून तयारीला लागावे, असे आदेश महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिले आहेत.

०००००

बी.सी.झंवर/विसंअ

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *