दिव्यांग अमोलची ‘सुवर्ण’ भरारी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दिली प्रेरणा

नागपूर, दि. ०२ : जन्मतःच दोन्ही पायांनी अधू असल्याने आपले पुढे कसे होणार असा प्रश्न त्याला पडायचा पण काय करावे कळत नव्हते, मात्र त्याच अमोलने क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकून घेतलेली भरारी इतरांसाठी प्रेरणादायी आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका भाषणाने आपल्यात जिद्द निर्माण झाली पायांनी अधू असूनही काही भरीव करू शकलो, असा कृतज्ञतापूर्वक उल्लेख अमोल करतो.

नागपूर जिल्ह्यातील वलनी या खेड्यातून अमोल शिक्षणासाठी नागपुरात आला. जन्मतःच दोन्ही पाय अधू मात्र वयाच्या दहाव्या वर्षी आयुर्वेदिक औषधांनी एका पायात बऱ्यापैकी जोर आला. पण एक पाय अधू असल्याने त्याला सारे लंगड्या म्हणून बोलवायचे. त्यावेळी त्याला खूप वाईट वाटायचे. त्यामुळे आपणही आयुष्यात काही वेगळे करावे, असे त्याला वाटायचे आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचे भाषण ऐकल्यानंतर त्याला तो मार्ग सापडला होता. या वर्षी थायलंडमध्ये झालेल्या दिव्यांगांच्या स्पर्धेत अमोलने भारताचे प्रतिनिधित्व केले आणि भारोत्तोलन स्पर्धेत सुवर्ण पदक पटकावले. देश विदेशातील स्पर्धांमध्ये त्याने भारोत्तोलन, पंजा कुस्ती अशा विविध क्रीडा प्रकारात पदकांची कमाई केली आहे. त्याच्या एका पायाला कंबरेपासून कॅलिपर लावले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वेळोवेळी दिलेल्या प्रोत्साहनामुळे आज अमोल एक यशस्वी उद्योजक आहे आणि शेकडो तरुणांना त्याने रोजगार दिला आहे. यातून पाचशेच्या वर दिव्यांग आपल्या पायावर उभे झाले आहेत.

दिव्यांग संवाद या उपक्रमाद्वारे दिव्यांगांचे प्रश्न सोडविण्यासाठी त्याची धडपड सुरू आहे. नागपुरात जिम सुरू करून दिव्यांग तरुणांना पंजा कुस्तीचे प्रशिक्षण अमोल देत आहे. एखादे सकारात्मक भाषण कसे कायापालट करू शकते, याचे माझे आयुष्य उत्तम उदाहरण असल्याचे त्याने सांगितले.

०००

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *