दातृत्वाचा धनी हरपला!

मुंबई, २२ मार्च : ज्येष्ठ नेते, माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाने दातृत्वाचा धनी हरपला आहे. शिक्षण संस्थांचे जाळे आणि प्रचंड मोठे सामाजिक कार्य उभे करताना त्यांच्या संपूर्ण राजकारणात सामान्य माणूस हा कायम केंद्रस्थानी असायचा, अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दत्ता मेघे यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.

आपल्या शोकसंदेशात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात की, दत्ता मेघे यांनी आपल्या राजकीय आणि सामाजिक जीवनात कायमच सर्वसामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवूनच आयुष्यभर ते कार्यरत राहिले. त्यामुळेच एक लोकनेता अशी त्यांची प्रतिमा होती. विविध शैक्षणिक संस्था उभारून त्यांनी विदर्भातील तरुणांच्या शिक्षणाची सोय तर केलीच आणि या संस्थाही नावारूपाला आणल्या. ज्येष्ठ नागरिकांसाठी त्यांच्या संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांमुळे एक मोठा आधार ज्येष्ठांना मिळाला. दातृत्व हे दत्ताभाऊंचे वैशिष्ट्य होते. अनेक गरिबांवर त्यांनी मोफत उपचार सुविधा उपलब्ध करून दिल्या. एक आदर्श राजकारणी म्हणून त्यांची ख्याती होती. वर्धा, नागपूर-विदर्भातील विकासाच्या राजकारणात त्यांनी कधीही पक्षीय भेद आणला नाही. सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यात सुद्धा त्यांचा सदैव पुढाकार असायचा. नव्या पिढीचे मार्गदर्शक म्हणून त्यांनी भूमिका बजावली. म्हणूनच सर्वच राजकीय पक्षात त्यांचे चाहते आहेत, हेच त्यांच्या यशाचे गमक. माझे त्यांच्याशी कौटुंबिक संबंध होते. अनेक प्रश्नांवर वडिलकीच्या नात्याने ते मार्गदर्शन करायचे. त्यांच्या निधनाने माझी वैयक्तिक हानी झाली आहे. दत्ताभाऊंना माझी भावपूर्ण श्रद्धांजली. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *