जिल्ह्यातील प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कामे करावीत – पालकमंत्री जयकुमार रावल

धुळे, दि. 17 (जिमाका वृत्तसेवा):  जिल्ह्यातील कृषी, सिंचन, पुनर्वसन, शिक्षण, अतिवृष्टी यातील प्रलंबित प्रश्न सोडवून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व विभागांनी समन्वयाने कामे करावीत, असे निर्देश पालकमंत्री जयकुमार रावल यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात पालकमंत्री श्री.रावल यांच्या अध्यक्षतेखाली जिल्ह्यातील विविध विषयांबाबत आढावा बैठक झाली. यावेळी ते बोलत होते. बैठकीस माजी केंद्रीय सरंक्षण राज्यमंत्री डॉ.सुभाष भामरे, आमदार मंजुळा गावित, राघवेंद्र पाटील, अपर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजिज शेख, पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, महानगरपालिका आयुक्त अमिता दगडे पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी गंगाराम तळपाडे उपस्थित होते.

पालकमंत्री श्री.रावल म्हणाले की, धुळे जिल्ह्यातील विविध जलाशयातील  100 टक्के पाणी साठा उपलब्ध असून यावर्षी पाणी आरक्षण करताना 31 जुलै, 2027 पर्यंत सर्वांना पाणी पुरेल, असे नियोजन करावे. पाणी आरक्षित आराखडा तयार करुन त्यांची व्यापक प्रमाणात प्रसिद्धी करावी. पाटचाऱ्यांची दुरुस्ती करावी. नियोजित वेळेत आरक्षित पाणी सोडावे. लोकप्रतिनिधींनी प्रकल्प दुरुस्तीबाबत प्रस्ताव सादर केल्यास तो तयार करुन शासनाकडे सादर करावा. महानगरपालिकेने धुळे शहराला एक दिवसाआड पाणी देण्यासाठी नियोजन करावे. सुलवाडे, सारंगखेडा बॅरेजच्या लिकेजची दुरुस्तीची कामे करावीत. सुलवाडे जामफळ योजनेच्या कामांना गती देवून नियोजनानुसार कामे करावीत. पंपगृहात सौर ऊर्जा प्रणालीच्या वापराचे नियोजन करावे. अतिवृष्टी, वादळामुळे शेती आणि शेतकऱ्यांसह पिके, जनावरे, घरांची पडझड आदींचे पंचनामे करुन मदतीचा प्रस्ताव त्वरीत शासनास सादर करावा. घराची पडझड झालेल्यांना प्रधानमंत्री आवास योजने देण्याचा प्रस्ताव सादर करावा.  यावेळी पुनवर्सित गावांच्या  समस्या बाबत चर्चा होऊन हा प्रश्न सोडविण्यासाठी संयुक्त बैठक आयोजित करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

पालकमंत्री म्हणाले की, धुळे जिल्ह्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळेत विद्यार्थ्यांचा शिक्षणाचा दर्जा वाढवा, क्रीडाक्षेत्रात संधी मिळावा व कलागुणाना प्रोत्साहन मिळावे यासाठी दरवर्षी तालुका व जिल्हास्तरावर क्रीडा महोत्सवाचे आयोजन करावे. शिक्षण विभागाने शाळेची पटसंख्या वाढविण्यासाठी प्रयत्न करावे. विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार शिक्षकांची नियुक्ती करावी. ज्याठिकाणी शिक्षण नाही तेथे अतिरिक्त शिक्षकांनी नियुक्ती करावी. शिक्षण विभागाने वर्षभाराचा क्रीडा व सांस्कृतिक कामाचा आराखडा तयार करावा. विद्यार्थ्यांच्या आवडीनुसार सर्व शाळेत दररोज किमान अर्धा तास खेळाचे प्रशिक्षण देण्यात यावे. विद्यार्थ्यांच्या मनातील गणित व विज्ञानाची भिती घालविण्यासाठी विद्यार्थ्यांचा योग्य सराव करुन घेण्याच्या सूचना पालकमंत्री श्री.रावल यांनी दिल्यात. आमदार राघवेंद्र पाटील, आमदार मंजुळाताई गावित यांनी चर्चेत सहभाग घेतला. बैठकीस विविध विभागाचे अधिकारी कर्मचारी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *