नवी दिल्ली, दि. ०१: महाराष्ट्र आणि कोकण भागातील प्रवाशांची दीर्घकालीन मागणी लक्षात घेऊन भारतीय रेल्वेने छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (मुंबई) ते सावंतवाडी रोड दरम्यान नवीन दैनिक एक्स्प्रेस रेल्वे सेवा सुरू करण्यास अधिकृत मंजुरी दिली आहे. सुमारे ५१० किलोमीटर अंतर व्यापणाऱ्या या नव्या सेवेमुळे मुंबई महानगर क्षेत्र आणि संपूर्ण कोकण किनारपट्टीदरम्यान जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर रेल्वे संपर्क अधिक सक्षम होणार आहे.
नवीन वेळापत्रकानुसार छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस – सावंतवाडी रोड एक्स्प्रेस या गाडीचा क्रमांक १५०८७, तर परतीच्या दिशेने धावणाऱ्या सावंतवाडी रोड – छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस एक्स्प्रेस या गाडीचा क्रमांक १५०८८ असा असेल. ही एक्स्प्रेस दररोज धावणार असून प्रवाशांच्या सोयीसाठी दादर, ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, अदावली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ आणि सावंतवाडी रोड या प्रमुख स्थानकांवर व्यावसायिक थांबे देण्यात आले आहेत.
या नव्या रेल्वे सेवेमुळे मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतील प्रवाशांना अधिक सुलभ, जलद आणि विश्वासार्ह प्रवासाची सुविधा उपलब्ध होणार आहे. विशेषतः दक्षिण कोकणातील प्रसिद्ध समुद्रकिनारे, ऐतिहासिक किल्ले, धार्मिक स्थळे तसेच निसर्ग पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या पर्यटकांसाठी ही सेवा मोठी दिलासादायक ठरणार आहे. त्याचबरोबर मुंबईत शिक्षण, रोजगार, व्यवसाय आणि अन्य कामानिमित्त नियमित प्रवास करणारे विद्यार्थी, नोकरदार, व्यापारी आणि कोकणवासीयांना या सेवेचा मोठा लाभ होणार आहे.
या निर्णयामुळे कोकणातील पर्यटन, व्यापार, उद्योग आणि स्थानिक अर्थव्यवस्थेला नवी चालना मिळण्यास मदत होणार असून, वाढत्या प्रवासी मागणीची पूर्तता करण्याबरोबरच संतुलित प्रादेशिक विकास आणि सर्वसमावेशक रेल्वे संपर्क विस्तारण्याच्या भारतीय रेल्वेच्या प्रयत्नांना अधिक बळ मिळणार आहे.