अंगाई-युनिसेफ च्या मोहिमेमुळे आंबेवाडी गाव बालविवाहमुक्त, जनजागृती मोहिमेला गावकऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद

मुंबई, दि. १५: बालविवाह मुक्तीकडे वाटचाल करत राज्य शासनाच्या सहकाऱ्याने ‘अंगाई-युनिसेफ’ने धाराशिव जिल्ह्यातील आंबेवाडी गावात जनजागृती मोहीम राबविली. या मोहिमेला प्रतिसाद देत गेल्या दोन वर्षापासून आंबेवाडी गावात एकही बालविवाह झाला नसल्याची माहिती युनिसेफने पत्रकाद्वारे दिली आहे.

गावाने बालविवाहा विरोधात एक सकारात्मक आणि प्रेरणादायी उदाहरण निर्माण केले आहे. सलग दोन वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून राबविण्यात आलेल्या ‘उत्सव समतेचा’ आणि ‘मीना राजू मंच’ या अभियानांमुळे गावात सामाजिक परिवर्तन घडताना दिसत आहे. अंगाई-युनिसेफ यांच्या सहकार्याने धाराशिव जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या या उपक्रमात १२० शाळा, ८०० हून अधिक शिक्षक आणि सुमारे १८ हजार विद्यार्थी सहभागी झाले आहेत. स्वयं शिक्षण प्रयोग (एसएसपी), कोरो आणि मावा या स्थानिक संस्थांनीही अभियानाला सक्रिय सहकार्य केले.

गावात आयोजित ‘उत्सव समतेचा’ कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांनी ढोल-ताशे, लेझीम, गीते आणि घोषणांच्या माध्यमातून बालविवाह, लैंगिक भेदभाव आणि मुलींच्या शिक्षणाबाबत व्यापक जनजागृती केली. ‘बालविवाह बंद करा’ आणि ‘मुलींना शिक्षण द्या’ अशा घोषणांसह विद्यार्थ्यांनी संपूर्ण गावातून रॅली काढून नागरिकांना जागृत केले.

मंदिर परिसरात गावातील नागरिकांनी बालविवाह रोखण्याची आणि प्रत्येक मुलीला शिक्षणाची संधी देण्याची सामूहिक शपथ घेतली. ‘माझं लग्न लहान वयात झालं होतं, पण माझ्या नातीला तसं आयुष्य देणार नाही,” असे गावातील महिला आश्वासित करताना दिसत आहेत.

शाळांमध्ये आयोजित नाटक, भाषण, वादविवाद आणि भूमिका परिवर्तन यासारख्या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांनी स्त्री-पुरुष समानतेचा संदेश दिला. इयत्ता आठवीतील समीक्षा हिने, “आता मुलं स्वयंपाक करतात आणि मुली फुटबॉल खेळतात. माझं कुटुंब माझ्या समानता आणि शिक्षणाचा संदेश आता गावाच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनत आहे, असे विश्वासाने सांगितल्याची माहिती युनिसेफने दिली.

०००

श्रध्दा मेश्राम /वि.सं.अ.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *