उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून वैभवी देशमुख हिच्या बारावी परीक्षेतील यशाबद्दल अभिनंदन

मुंबई, दि. ०६: बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे दिवंगत सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हीने अत्यंत कठीण, आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जात इयत्ता बारावी परीक्षेत विज्ञान शाखेतून 85.33 टक्के गुण मिळविल्याबद्दल उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तिचे अभिनंदन केले आहे. वैभवीने मिळविलेल्या यशाने तिच्या अंगभूत गुण, हुशारी, धैर्य, संयम, जबाबदारीच्या जाणीवेचं दर्शन घडल्याचे सांगून तिच्या यशाने महाराष्ट्राला आनंद झाला आहे, अशा शब्दात त्यांनी तिचे कौतुक केले आहे.

वैभवी देशमुख हिला पाठविलेल्या अभिनंदनपर पत्रात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटले आहे की, “इयत्ता बारावी बोर्डाच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. या परीक्षेत विज्ञान शाखेत 85.33 टक्के गूण मिळवून तू उत्तीर्ण झाल्याचे समजून माझ्यासह संपूर्ण महाराष्ट्राला आनंद झाला आहे. वडील दिवंगत संतोष देशमुख यांच्या मृत्यूनंतर अत्यंत दु:खद, आव्हानात्मक परिस्थितीला सामोरे जात मिळवलेले यश तुझ्या अंगभूत गुण, हुशारी, धैर्य, संयमाचे, जबाबदारीच्या जाणीवेचे दर्शन घडवणारे आहे. तुझ्या यशातून राज्यातील इतर विद्यार्थ्यांना लढण्याची, यशस्वी होण्याची प्रेरणा मिळेल, असा विश्वास आहे. तुझ्या यशाने वडील स्वर्गीय संतोष देशमुख यांना खुप आनंद झाला असता. तुझ्या कष्ट, जिद्दीला सलाम. यापुढेही शैक्षणिक कारकिर्दीत, जीवनाच्या प्रत्येक टप्प्यावर तुला असंच यश मिळत राहो, आम्ही सर्व कायमच तुझ्यासोबत आहोत,” असा विश्वास देत उपमुख्यमंत्री पवार यांनी तिच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *