इयत्ता ११ वी प्रवेश प्रक्रियेची विद्यार्थिनींसाठी विशेष फेरी-२ जाहीर

मुंबई, दि. ७ : राज्यातील इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत विद्यार्थिनींसाठी विशेष फेरी-२ चे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून या फेरीची प्रक्रिया १० जुलैपासून सुरू होणार आहे. विद्यार्थिनींना प्रवेशाची अतिरिक्त संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही विशेष फेरी राबविण्यात येत असल्याची माहिती माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाने दिली आहे.

२०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठी राज्यातील ९ हजार ६८८ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये इयत्ता ११ वीची ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया सुरू आहे. विशेष फेरी-२ अंतर्गत १० ते ११ जुलैदरम्यान नवीन विद्यार्थिनींची नोंदणी, अर्जातील दुरुस्ती तसेच पसंतीक्रम भरण्याची सुविधा उपलब्ध राहणार आहे. विद्यार्थिनींना किमान एक आणि कमाल दहा कनिष्ठ महाविद्यालयांचे पसंतीक्रम नोंदविता येणार आहेत.

या फेरीतील प्रवेश वाटप प्रक्रिया १२ जुलै रोजी राबविण्यात येईल. त्यानंतर १३ जुलै रोजी प्रवेश वाटप यादी प्रसिद्ध केली जाणार असून विद्यार्थिनींना त्यांच्या लॉगिनद्वारे वाटप झालेल्या कनिष्ठ महाविद्यालयाची माहिती उपलब्ध होईल. प्रवेशासाठी पात्र ठरलेल्या विद्यार्थिनींना १३ ते १४ जुलैदरम्यान संबंधित कनिष्ठ महाविद्यालयात कागदपत्र पडताळणी करून प्रवेश निश्चित करता येणार आहे.

विशेष फेरी-२ नंतरच्या प्रवेश प्रक्रियेचे पुढील वेळापत्रक १४ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे. तसेच राज्यातील सर्व उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालये १५ जुलै २०२६ पासून नियमितपणे सुरू होणार आहेत. विद्यार्थिनी, पालक तसेच कनिष्ठ महाविद्यालयांनी जाहीर करण्यात आलेल्या वेळापत्रकानुसार सर्व कार्यवाही विहित मुदतीत पूर्ण करावी, असे आवाहन शिक्षण संचालनालयाने केले आहे.

00000

ब्रिजकिशोर झंवर/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *