उद्योगांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला मोठी उभारी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

चंद्रपूर, दि. १४ : विदर्भात विपुल प्रमाणात खनिज संपत्ती आहे. या संपत्तीचा प्रदुषणमुक्त कसा वापर करावा, याचे नियोजन करूनच भद्रावती परिसरात दोन हरित पोलाद प्रकल्प उभारण्यात येत आहे. उद्योगांमुळे एक ईको सिस्टीम तयार होते. रोजगार निर्मिर्तीसोबत सेवाक्षेत्रात वाढ होते. तसेच त्याचा फायदा परिसरातील पर्यटनक्षेत्रालाही होतो. एकप्रकारे देशाच्या अर्थव्यवस्थेला उद्योगांमुळे मोठी उभारी मिळते, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

भद्रावती एमआयडीसी परिसरात न्यू एरा क्लिनटेक प्रा. लि. आणि ग्रेटा एनर्जी प्रा. लि. च्या एकात्मिक हरीत पोलाद प्रकल्पाचे भूमिपूजन करताना मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते.

यावेळी केंद्रीय कोळसा व खाण मंत्री जी. किशन रेड्डी, आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके, वित्त व नियोजन राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल, खासदार प्रतिभा धानोरकर, आमदार सर्वश्री किशोर जोरगेवार, देवराव भोंगळे, करण देवतळे, माजी मंत्री हंसराज अहीर, माजी खासदार अजय संचेती, कोल इंडियाचे चेअरमन संजीव कुमार झा, उद्योग विभागाचे प्रधान सचिव डॉ. पी. अनबलगन, ग्रेटा एनर्जीचे चेअरमन नितेश चौधरी, वैभव काकुलते, व्यवस्थापकीय संचालक हेमंत पांडे (वेकोली), अनुप गोयल (ग्रेटा एनर्जी), बाळासाहेब दराडे (न्यू एरा क्लिनटेक), मधुसूदन अग्रवाल, जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी., मुख्य कार्यकारी अधिकारी पुलकित सिंह, पोलिस अधिक्षक मुम्मका सुदर्शन आदी उपस्थित होते.

भारताच्या इतिहासात एका आगळ्यावेगळ्या उद्योगाचे आज भद्रावती (जि. चंद्रपूर) येथे भूमिपूजन होत आहे, असे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, वातावरण बदल हा जगासमोर मोठा प्रश्न आहे. त्याचा फटका शेतीसोबतच उद्योगांनाही बसतो. त्यामुळे खनिज संपत्तीचा प्रदूषणमुक्त उपयोग करण्यावर भर देण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय कोळसा मंत्री जी. किशन रेड्डी यांनी जगातील उत्तम तंत्रज्ञानसह खनिजांचे उत्पादन करण्यास पुढाकार घेतला आहे. याच माध्यमातून कोल गॅसिफिकेशनचे सात प्रकल्प येत आहेत, त्यापैकी चार प्रकल्प महाराष्ट्रात आणि तेही विदर्भात येणार आहे. असे धोरण तयार करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. या दोन्ही उद्योगांमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेत मोठी भर पडणार आहे.

विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, भंडारा, गोंदिया येथे स्टील हब तयार होत आहे. या परिसरात तीन लक्ष कोटी रुपयांची गुंतवणूक आली असून एक लाख लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे. गडचिरोलीची आदिवासी मुले तर ऑस्ट्रेलियात शिक्षण घेत आहेत. या क्षेत्रातील भविष्य हे ग्रीन स्टीलचे आहे. उद्योगातून जेवढे ग्रीन स्टील तयार होईल, त्याला 100 टक्के निर्यात मार्केट आहे. न्यू एरा आणि ग्रीन एनर्जी या दोन्ही उद्योगांच्या माध्यमातून या परिसरात 10 हजार रोजगार उपलब्ध होईल. तंत्रज्ञ व इतर जॉबसाठी चंद्रपूर व आसपासच्या गावातील तरुणांना प्रशिक्षण देऊन रोजगार उपलब्ध करून द्यावा. राष्ट्रकार्य पूर्ण करायचे असेल तर 70 ते 80 टक्के स्थानिकांना रोजगार देणे आवश्यक आहे. उद्योगांच्या पाठीशी सरकार नेहमीच उभे आहे. उद्योगाच्या ईको सिस्टीमचा फायदा येथील स्थानिकांना झाला पाहिजे. या दोन प्रकल्पामुळे चंद्रपूरचे नाव देशाच्या नकाशावर झळकले आहे.

पूर्व विदर्भात मायनिंगवर आधारित उद्योग येत असल्यामुळे येथील अर्थव्यवस्था पूर्णपणे बदलत आहे. आपल्या राज्याच्या अर्थव्यवस्थेने अनेक देशातील अर्थव्यवस्थांना मागे टाकले आहे. जगात 30 व्या क्रमांकाची आपल्या राज्याची अर्थव्यवस्था आहे. शेती, उद्योग, सेवाक्षेत्र सर्वच क्षेत्रात गुंतवणूक करून रोजगार निर्मितीच्या माध्यमातून राज्याला पुढे नेण्याचा आपला संकल्प आहे, असे यावेळी मुख्यमंत्री म्हणाले.

औद्योगिक विकासात कोळशाची भुमिका अतिशय महत्त्वाची – केंद्रीय कोळसा मंत्री जी. किशन रेड्डी

देशात कोळशाची कमी नाही. विकासासाठी तसेच रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी कोळशाचा उपयोग होतो. देशाच्या औद्योगिक विकासात कोळशाची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे, असे केंद्रीय कोळसा मंत्री जी. किशन रेड्डी  यांनी सांगितले. पुढे ते म्हणाले, चंद्रपूर आणि भद्रावती या भागात नवीन तंत्रज्ञानायुक्त औद्योगिक कंपनी येत आहे. यातून या भागाचा विकास होईल. दोन्ही कंपन्यांच्या आगमनाने येथील स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल. तसेच दोन्ही कंपन्यांच्या माध्यमातून 17 हजार कोटीची गुंतवणूक भद्रावती येथे येत आहे.

कोल गॅसिफिकेशनसाठी आपण विदेशावर अवलंबून होतो. मात्र देशाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून तंत्रज्ञानयुक्त कोल गॅसिफिकेशनची संकल्पना आली आहे. हा परिसर कोल गॅसिफिकेशनचे हब होईल. सात पैकी चार प्रकल्प या भागात येत आहे. महाराष्ट्र हे औद्योगिक प्रगत राज्य आहे. एक ट्रिलियन अर्थव्यवस्था होण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राची वाटचाल सुरू आहे. ज्यांनी या प्रकल्पासाठी जमीन दिली, त्यांनी देश निर्माण करण्यासाठी एक पाऊल उचलले आहे. त्यामुळे या दोन्ही प्रकल्पात स्थानिकांना मोठ्या प्रमाणात रोजगार द्यावा तसेच वेळेपूर्वी हा प्रकल्प पूर्ण करावा, असे ते म्हणाले.

ग्रेटा एनर्जी प्रा. लि.चा कोळसा गॅसिफिकेशन आधारित स्टील  प्रकल्प

ग्रेटा एनर्जी समुहातर्फे भद्रावती एम.आय.डी.सी. परिसरात ग्रीनफिल्ड स्टील प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी पहिला व दुसरा टप्पा मिळून एकूण भांडवली गुंतवणूक सुमारे 10319 कोटी इतकी आहे. या प्रकल्पामुळे सुमारे 5 हजार लोकांना थेट व अप्रत्यक्ष रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहे.

न्यू एरा क्लिनटेक प्रा. लि.चा भारतातील पहिला एकात्मिक कोळसा गॅसिफिकेशन प्रकल्प

न्यू एरा क्लीनटेक कंपनीद्वारे भारतातील पहिला ग्रीनफिल्ड कोळसा गॅसिफिकेशन (कोळसा ते रसायने) प्रकल्प भद्रावती  येथे 1650 एकरच्या औद्योगिक भूखंडावर उभारण्यात येत आहे. या प्रकल्पात दरवर्षी 50 लाख मेट्रिक टनांपेक्षा अधिक कोळशावर प्रक्रिया करून उच्च मूल्याची रसायने निर्माण केली जातील.

ग्रेटा एनर्जीच्या वतीने व्यवस्थापकीय संचालक अनुप गोयल यांनी तर न्यू एरा प्रा. लि. च्या वतीने व्यवस्थापकीय संचालक बाळासाहेब दराडे यांनी प्रास्ताविकातून आपापल्या प्रकल्पाबद्दल माहिती दिली.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *