‘ईएसआयसी’ रुग्णालयात रुग्णसेवेच्या गुणवत्तेत वाढ करा – पालकमंत्री प्रकाश आबिटकर

कोल्हापूर, दि. 21 (जिमाका): राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आज ताराबाई पार्क येथील राज्य कामगार विमा महामंडळाच्या (ईएसआयसी) रुग्णालयाला भेट देऊन रुग्णसेवेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी रुग्णालयात दाखल असलेल्या रुग्णांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली आणि रुग्णालयातील सोयी-सुविधांबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली. रुग्णसेवेच्या गुणवत्तेत सुधारणा करण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना महत्त्वपूर्ण सूचना देत त्यांनी रुग्णसेवा अधिक प्रभावी आणि रुग्णसन्मुख करण्याचे निर्देश दिले.

पालकमंत्री आबिटकर यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या समन्वयाने ‘ईएसआयसी’ रुग्णालयात कोल्हापूरसह पश्चिम महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांतून येणाऱ्या रुग्णांना सर्वोत्तम वैद्यकीय सेवा मिळाव्यात यासाठी आवश्यक सुधारणा आणि पाठपुरावा करण्याचे आदेश दिले. याबाबत लवकरच वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या. रुग्णालयातील वैद्यकीय सेवा, रुग्णसंख्या, डॉक्टर आणि कर्मचारी यांच्या कामकाजात सुसूत्रता आणण्यावर त्यांनी विशेष भर दिला. रुग्णसेवा ही सर्वोच्च प्राधान्याची बाब आहे. येथे येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला दर्जेदार आणि वेळेत उपचार मिळाले पाहिजेत, असे ते म्हणाले.
रुग्णालयातील सध्याच्या सुविधांचा आढावा घेताना आबिटकर यांनी औषधांचा पुरवठा, स्वच्छता, तपासणी उपकरणांची उपलब्धता आणि रुग्णांना मिळणारी वैद्यकीय सल्ला-सुविधा याबाबत तपशीलवार चर्चा केली. त्यांनी रुग्णालय प्रशासनाला रुग्णांच्या तक्रारी तातडीने सोडवण्यासाठी यंत्रणा उभारण्याचे निर्देश दिले. तसेच, रुग्णालयात येणाऱ्या विमाधारक कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना कोणत्याही अडचणींना सामोरे जावे लागू नये, यासाठी विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले.

यावेळी रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांनी पालकमंत्र्यांना रुग्णालयातील सध्याच्या सुविधा आणि आव्हानांबाबत माहिती दिली. ते म्हणाले, आम्ही रुग्णसेवेची गुणवत्ता वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करत आहोत. पालकमंत्र्यांच्या सूचनांनुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन कामकाजात सुधारणा करण्यासाठी ठोस पावले उचलली जातील. रुग्णालयात सध्या उपलब्ध असलेल्या तज्ज्ञ डॉक्टरांची संख्या, तपासणी कक्ष, बेडची उपलब्धता आणि आपत्कालीन वैद्यकीय सेवांचा आढावाही यावेळी घेण्यात आला.

पालकमंत्री आबिटकर यांनी यावेळी रुग्णालयातील कर्मचाऱ्यांशी संवाद साधताना त्यांना प्रोत्साहन दिले. तुम्ही सर्वजण रुग्णसेवेच्या माध्यमातून समाजासाठी महत्त्वपूर्ण योगदान देत आहात. तुमच्या मेहनतीमुळे अनेक कुटुंबांना आधार मिळतो. यापुढेही असेच समर्पित भावनेने काम करा, असे ते म्हणाले. त्यांनी रुग्णालयातील स्वच्छता आणि रुग्णांना मिळणाऱ्या जेवणाच्या गुणवत्तेवरही लक्ष देण्याचे निर्देश दिले.
या भेटीवेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक, वरिष्ठ डॉक्टर, प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. पालकमंत्र्यांच्या या भेटीमुळे रुग्णालयातील सेवांमध्ये लवकरच सकारात्मक बदल दिसतील, अशी अपेक्षा रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांनी व्यक्त केली. ‘ईएसआयसी’ रुग्णालय हे विमाधारक कामगारांसाठी महत्त्वपूर्ण वैद्यकीय केंद्र असून, येथील सुधारणांमुळे हजारो कुटुंबांना त्याचा लाभ मिळणार आहे.

00000

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *