मुंबई दि. 15 :- जलसाक्षरता वाढवणे, पाण्याच्या बचतीचे महत्त्व पटवून देणे आणि जलव्यवस्थापनाच्या शाश्वत उपाययोजना राबविण्यासाठी जलसंपदा विभागाच्या वतीने ‘जल व्यवस्थापन कृती पंधरवडा 2025’ चा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत करण्यता आला. जल व्यवस्थापन कृती पंधरवड्यातील कार्यक्रमांमध्ये प्रत्येक पालकमंत्र्यांनी सक्रिय सहभागी घेऊन कामे करून घेण्याचे आवाहन मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांनी यावेळी केले.
जलसंपदा विभागाच्या वतीने 15 ते 30 एप्रिल 2025 या कालावधीत ‘जलव्यवस्थापन कृती पंधरवडा’ साजरा केला जाणार आहे. या पंधरवड्याचे उद्घाटन मंत्रालयातील मंत्रीमंडळ सभागृहात झाला. त्यावेळी जलसंपदा ( गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील, जलसंपदा( विदर्भ, तापी, कोकण खोरे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह मंत्रिमंडळातील सदस्य, मुख्य सचिव सुजाता सौनिक, अपर मुख्य सचिव दीपक कपूर, सचिव संजय बेलसरे आदी उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याच्या पोस्टरचे अनावरण करण्यात आले. मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, जल व्यवस्थापन कृती पंधरवड्याच्या माध्यमातून समाजात पाण्याच्या सुयोग्य वापराबाबत जनजागृती वाढविण्यात यावी. राज्यातील सिंचन व बिगर सिंचनासाठी आवश्यक पाण्याचा प्रश्न सोडविण्याचे सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहेत. परंतु लोकप्रतिनिधी व नागरिकांच्या सक्रिय सहभागाशिवाय हा प्रश्न सुटणार नाही. त्यामुळे हा उपक्रम लोकाभिमुख करण्यासाठी सर्व यंत्रणा व घटकांनी सक्रिय सहभाग घ्यावा.
जलव्यवस्थापन कृती पंधरवडामध्ये राबविण्यात येणारे उपक्रम
दिनांक १५ एप्रिल २०२५ रोजी जल व्यवस्थापन कृती पंधरवडा २०२५ साजरा करणे व जलसंपदा पंधरवडा शुभारंभ, १६ एप्रिल रोजी जलसंपदा अधिकारी/कर्मचारी यांचे प्रशिक्षण व ई-ऑफिस प्रणाली कार्यान्वित करणे, १७ एप्रिल रोजी स्वछ व सुंदर माझे कार्यालय, जल पुनर्भरण (Rain water Harvesting), १८ एप्रिल रोजी शेतकरी/पाणी वापर संस्था संवाद, १९ एप्रिल रोजी भूसंपादन व पुनर्वसन इ. अडचणी निराकरण, कालवा संयुक्त पाहणी, २० एप्रिल रोजी कालवा स्वच्छता अभियान, २१ एप्रिल रोजी उपसा सिंचनाचे पाणी परवानगी देण्यासाठी तक्रारींची निरसन करणे, २२ एप्रिल रोजी अनधिकृतपणे वाणिज्य व औद्योगिक पाणी उपसा प्रकरणे शोध घेऊन कार्यवाही करणे , २३ एप्रिल रोजी जलसंपदा व कृषी विभागामार्फत संयुक्तपणे पीक पद्धतीबदल, उत्पादकता वाढ, पाण्याचे नियोजन इ. बाबत बैठक/कार्यशाळा मार्गदर्शन कार्यक्रम, २४ एप्रिल रोजी सिंचन ई-प्रणाली, पाणी दर, पाणीपट्टी आकारणी व वसुली, थकित पाणीपट्टी प्रकरणांचा आढावा, २५ एप्रिल रोजी विद्यापीठ/केव्हिके/ सेवाभावी संस्था यांच्या समवेत संवाद व कृती कार्यक्रम, २६ एप्रिल रोजी महानगरपालिका, नगरपालिका, ग्रामपंचायत यांच्या प्रत्यक्ष पाणी वापराचा जललेखा परीक्षण व पाण्याचा पुनर्वापर न करता धरणांमध्ये व नदीमध्ये सांडपाणी सोडण्यात येत असल्याबद्दल प्रकरणांचा शोध घेणे, २७ एप्रिल रोजी आपत्ती व्यवस्थापन करण्यात मार्गदर्शन (पूर/मालमत्तेचे रक्षण), २८ एप्रिल रोजी महसूल विभागाच्या समन्वयाद्वारे महामंडळाचे नावे संपादित जमिनींच्या ७/१२ उताऱ्यावर नोंदी घेणे/अतिक्रमण निष्कासन दिनांक ३१ मे पूर्वी करणे, २९ एप्रिल रोजी पाणी वापर संस्था सक्षमीकरण चर्चासत्र/कार्यशाळा आणि ३० एप्रिल २०२५ रोजी मा. पालकमंत्री यांच्या उपस्थितीत जिल्हा मुख्यालयी कार्यशाळा/महिला मेळावा आणि या पंधरवडा कालावधीत नाविन्यपूर्ण उपक्रम राबवणाऱ्या अभियंतांचा सत्कार व पंधरवडा समारोप असे कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत, अशी माहिती जलसंपदा( विदर्भ, तापी, कोकण खोरे विकास महामंडळ) व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
००००००
नंदकुमार वाघमारे/विसंअ