हुतात्मा भवनासाठी 50 लाखांचा निधी जाहीर
सोलापूर, दि. १४ : बलवडी गावासाठी आजचा दिवस अभिमानाचा व शौर्याचा आहे. कारण 59 वर्षांनंतरही देशासाठी प्राण अर्पण करणाऱ्या वीर सुपुत्राला गावाने विसरले नाही. सांगोला तालुक्यातील बलवडी गावात आज हुतात्मा महादेव शिंदे यांच्या स्मारकाचे अनावरण माझ्या हस्ते झाले हे माझे भाग्य आहे. हुतात्मा महादेव शिंदे यांचे स्मारक सांगोला तालुक्यातील तरुणांचे प्रेरणास्थळ होईल असा विश्वास पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी व्यक्त केला.
बलवडी (ता सांगोला) येथील हुतात्मा महादेव शिंदे स्मारकाचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते हुतात्मा स्मारकाचे अनावरण करण्यात आले. याप्रसंगी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख, माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील, तहसीलदार बाळू ताई भागवत, गटविकास अधिकारी योगेश कांबळे, पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांच्यासह मान्यवर पदाधिकारी आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी बोलताना पालकमंत्री गोरे यांनी बलवडी गावात हुतात्मा भवन उभारण्यासाठी 50 लाख रुपयांचा निधी देण्यात येईल अशी घोषणा केली. “आजचा दिवस बलवडीसाठी शौर्याचा आहे. हुतात्मा महादेव शिंदे आणि वीर माता पद्मिनी आई यांच्या त्यागामुळे देश सुरक्षित आहे. माझ्या हस्ते स्मारकाचे अनावरण होणे हे माझे भाग्य आहे,” असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
पालकमंत्री गोरे पुढे म्हणाले की, “सैनिकाची देशसेवा संपली तरी देशप्रेम संपत नाही. वीर माता पद्मिनी आई यांनी कुटुंब उभारून दिलेल्या बळामुळेच आज आपण त्यांना वंदन करू शकतो. देशासाठी शिंदे कुटुंबाचा त्याग मोठा आहे.” त्यांनी यावेळी सांगोला तालुक्यातील माण नदीतील पाण्याचा प्रश्न सोडवल्यानंतर आता विजेचा आणि पोलीस स्टेशनचा प्रश्न देखील मार्गी लावण्याची ग्वाही दिली.
आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी “पालकमंत्र्यांनी सांगोला तालुक्यात मानाचा तुरा रोवला आहे” असे मत व्यक्त केले. यावेळी माजी आमदार दीपक आबा साळुंखे पाटील यांचेही मनोगत झाले. कार्यक्रमात वीरमाता पद्मिनी आई शिंदे आणि सुभेदार राजेंद्र धायगुडे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात प्राचार्य संभाजी शिंदे यांच्या प्रास्ताविकाने झाली. सूत्रसंचालन तात्यासो शिंदे यांनी केले तर आभार माजी सरपंच बाळासाहेब शिंदे यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
००००