सार्वजनिक आरोग्य विभागाकडून बाल अवस्थेतील आरोग्य सुदृढ राखण्यावर भर – सचिव डॉ. निपुण विनायक

मुंबई, दि. १५ : राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग राज्यातील बाल अवस्थेतील आरोग्य सुदृढ राखण्यावर भर देत आहे.  तसेच, असंसर्गजन्य आजारांबाबत अधिक सजग असून, विविध विभागांच्या समन्वयातून प्रभावी उपाययोजना राबवत असल्याचे आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक यांनी सांगितले.

युनिसेफ इंडिया आणि प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरो (PIB) यांच्या संयुक्त विद्यमाने बाल अवस्थेतील असंसर्गजन्य आजारांवरील राज्यस्तरीय कार्यशाळा हॉटेल ताज प्रेसिडेंट, मुंबई येथे पार पडली. या कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. निपुण विनायक यांच्यासह PIB पश्चिम विभागाच्या महासंचालक स्मिता वत्स शर्मा, AIIMS नागपूरचे मुख्य संचालक डॉ. प्रशांत जोशी, युनिसेफचे महाराष्ट्र प्रमुख संजय सिंग आणि विवेक सिंग यांची प्रमुख उपस्थिती होती.

सचिव डॉ. विनायक यांनी सांगितले की, राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने बाल अवस्थेतील असंसर्गजन्य आजार टाळण्यासाठी विविध पातळ्यांवर उपाययोजना सुरू केल्या आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये गर्भारपणाच्या काळापासून काळजी घेतल्यास भविष्यात असे आजार टाळता येऊ शकतात.

त्यांनी दुर्लक्षित घटकांवर लक्ष केंद्रित करणे महत्वाचे असल्याचे सांगून म्हणाले की, समाजातील सर्व स्तरांपर्यंत पोहोचण्यासाठी, विशेषतः दुर्लक्षित समुदायांसाठी, आपण सर्वांनी मिळून काम करणे गरजेचे आहे.

यावेळी स्मिता वत्स – शर्मा यांनी माध्यमांची भूमिका महत्त्वाची असल्याचे सांगितले. तसेच सत्य माहिती समाजापर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. चुकीच्या आणि असत्य माहितीमुळे समाजात गैरसमज वाढतात, त्यामुळे माध्यमांनी काळजीपूर्वक सत्य माहितीचे प्रसारण करणे आवश्यक आहे. तसेच असंसर्गजन्य आजार, आहार, जीवनशैली आणि काळजी यासंदर्भात जनजागृती करणे आवश्यक आहे. राज्यस्तरीय कार्यशाळांमुळे विविध विषयांवर चर्चा होऊन त्याचा सकारात्मक परिणाम आरोग्य व्यवस्थेवर दिसून येईल असे त्यांनी यावेळी सांगितले.

कार्यशाळेत युनिसेफ व अन्य तज्ज्ञांनी असंसर्गजन्य आजारांची वाढती तीव्रता, लहान वयात होणारे परिणाम, आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांवर सखोल चर्चा केली.

००००

राजू धोत्रे/विसंअ/

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *