लखपती दीदी अभियानाच्या वाढीव लक्षांकपूर्तीसाठी बचतगटांच्या व्यापक सहभागावर भर द्यावा – मंत्री जयकुमार गोरे

मुंबई, दि. ५ : स्वयं सहाय्यता गटांमधील गरीब व गरजू महिलांना विविध उपजीविका उपक्रम, कौशल्य विकास, आर्थिक सक्षमीकरण आणि बाजारपेठेच्या संधी उपलब्ध करून देत त्यांना ‘लखपती दीदी’ बनविण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करावे. राज्यात एक कोटी लखपती दीदी निर्माण करण्याच्या उद्दिष्टपूर्तीसाठी बचतगटांच्या व्यापक सहभागावर भर देण्यात यावा, अशा सूचना ग्राम विकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे यांनी दिल्या.

‘लखपती दीदी’ अभियानाच्या वाढीव लक्ष्यांकबाबत मंत्रालयात आयोजित आढावा बैठकीत ग्राम विकास मंत्री गोरे यांनी यंत्रणांना सूचित केले. बैठकीस ग्राम विकास सचिव डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, उमेद’ अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीधर डुबे पाटील यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

ग्राम विकास मंत्री गोरे यांनी सांगितले की, महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी आणि ग्रामीण भागातील कुटुंबांचे उत्पन्न वाढविण्यासाठी ‘लखपती दीदी’ अभियान निश्चितच उपयोगी ठरणार आहे. त्यादृष्टीने याची अधिक व्यापक आणि प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे.  जिल्हानिहाय प्रगतीचा आढावा, महिला बचत गटांचे बळकटीकरण, नवीन महिलांचा समावेश, डिजिटल आजीविका नोंदणी, कौशल्य प्रशिक्षण तसेच उत्पन्नवाढीच्या विविध उपक्रमांच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत ‌मंत्री गोरे यांनी संबंधितांना सूचना दिल्या.

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत ‘महिला बचत गट नोंदणी मोहीम व १ कोटी लखपती दीदी संकल्प अभियान’ राबविण्याचा शासन निर्णय १७ जुलै २०२६ रोजी जारी केला आहे. २०२६ ते २०२९ या कालावधीत हे अभियान राज्यभर प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. या अभियानाद्वारे महिलांना केवळ बचत गटात सहभागी करून घेणे एवढ्यावर मर्यादित न राहता, विविध शासकीय योजनांचा कृतीसंगम साधून त्यांना कौशल्य विकास, वित्तीय सेवा तसेच त्यांनी उत्पादित केलेल्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यामुळे महिलांच्या उत्पन्नात वाढ होऊन आर्थिक समृद्धीचा मार्ग मोकळा होणार आहे.

केंद्र शासनाच्या सहा कोटी लखपती दीदी निर्माण करण्याच्या प्रस्तावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील एक कोटी ग्रामीण महिलांना ‘लखपती दीदी’ बनविण्याचा संकल्प सिद्ध करण्यासाठीचे नियोजन, उद्दिष्टपूर्ती आणि आगामी कृती आराखड्यावर बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

तसेच राज्यात आतापर्यंत ५० लाख लखपती दीदी घडविण्यात यश मिळाल्याबद्दल या अभियानात सहभागी अधिकारी, कर्मचारी, जिल्हा यंत्रणा, स्वयं सहाय्यता गट, समुदाय संसाधन व्यक्ती आणि संबंधित घटकांचे अभिनंदन  करण्यात आले. वाढीव  उद्दिष्टही त्याच जोमाने आणि लोकसहभागातून पूर्ण करण्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

0000

वंदना थोरात/विसंअ

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *