धुळे, दि. ८ मे २०२६ (जिमाका वृत्त) : धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे राजशिष्टाचार व पणन मंत्री जयकुमार रावल यांनी महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी यांची भेट घेतल्यानंतर जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निर्देशांची जिल्हा प्रशासनाने आठ दिवसांत पूर्तता केली आहे. त्यापैकी वीरमाता इंदुबाई गबाजी सूर्यवंशी (रा. विश्वनाथ, ता. धुळे) यांना २ हेक्टर जमिनीचे दस्तऐवज पालकमंत्री श्री. रावल यांच्या हस्ते इंदुबाई सूर्यवंशी यांना प्रदान करण्यात आले.
आज जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात हा कार्यक्रम झाला. यावेळी खासदार डॉ. शोभा बच्छाव, जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अजिज शेख, निवासी उपजिल्हाधिकारी शरद पवार आदी उपस्थित होते.
शहीद सैनिक पंढरीनाथ गबाजी सूर्यवंशी यांना २८ जून १९९९ मध्ये ऑपरेशन रिन्हो मोहिमेत वीरमरण प्राप्त झाले होते. इंदुबाई सूर्यवंशी या पंढरीनाथ सूर्यवंशी यांच्या मातोश्री आहेत. त्यांना जिल्हा प्रशासनाने वरपाडे, ता. शिंदखेडा येथील गट क्रमांक २३७ मधील २ हेक्टर जमीन दिली आहे. या जमिनीचे दस्तऐवज प्रदान करण्यात आले.
पालकमंत्री श्री. रावल यांनी सांगितले की, महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनी वीरमाता, वीरपिता, वीरपत्नी यांची भेट घेतली. त्यावेळी हा वीरपत्नी यांनी जमिनीचा प्रश्न उपस्थित केला होता. याबाबत त्याच दिवशी प्रशासनाची बैठक घेतली. एकूण पाच प्रस्ताव प्राप्त होते. त्यांची छाननी केली असता चार प्रस्ताव पात्र ठरले आहेत. त्यानुसार इंदुबाई सूर्यवंशी यांना आज जमिनीचे दस्तऐवज देण्यात आले. जिल्हा प्रशासनाने केलेल्या या कार्यवाहीबद्दल पालकमंत्री श्री. रावल यांनी समाधान व्यक्त केले.
00000
—