रायगड जिल्ह्यातील मच्छीमारांच्या समस्यांबाबत तातडीने कार्यवाही करा – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई, दि. १६ : रायगड जिल्ह्यातील आरसीएफ कंपनीच्या मरीन आउटफॉल लाईनमुळे निर्माण झालेल्या अडचणी दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा आढावा मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी मंत्रालयात घेतला.

यावेळी आवश्यक चॅनेल व संरक्षण बंधारा उभारणी तसेच थळ-नवगाव परिसरातील मच्छीमार बांधवांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. संबंधित कामे लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्याच्या सूचना मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

मौजे नवेदार-नवगाव येथील मत्स्य जेट्टी तसेच अलिबाग येथील रेवस-मांडवा प्रवासी जेट्टीच्या प्रलंबित विषयांचाही आढावा घेण्यात आला. या प्रकल्पांशी संबंधित विविध बाबींची सद्यस्थिती तपासून प्रलंबित कामांना गती देण्याचे निर्देश मंत्री राणे यांनी दिले. स्थानिक मच्छीमार आणि नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाच्या असलेल्या या प्रकल्पांची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी आवश्यक समन्वय साधण्याबाबतही मंत्री राणे यांनी सूचना केल्या.

बैठकीस आमदार महेंद्र दळवी, महाराष्ट्र सागरी मंडळ चे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. प्रदीप,महाराष्ट्र मत्स्योद्योग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश खपले तसेच आरसीएफ कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *