‘स्व.मा.अजितदादा पवार पर्यटन उद्यान बारामती’ आणि “देवगिरी ते देवराई” नाम फलकाचे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण
पुणे, दि. १६ : राज्य शासनाने सन २०४७ पर्यंत ३०० कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट ठरविले असून यावर्षी सुरुवातीच्या टप्प्यात १८ कोटी वृक्ष लागवड करण्याचे नियोजन आहे; वृक्ष लागवड ही जन चळवळ करण्याकरिता शाळा, महाविद्यालये स्वयंसेवी संस्था, औद्योगिक कंपन्या आदींनी या मोहिमेत राज्य शासनासोबत सहभागी होऊन योगदान द्यावे, असे आवाहन राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी केले. कन्हेरी येथील पर्यटन उद्यानाचे ‘स्व.मा.अजितदादा पवार पर्यटन उद्यान बारामती’ आणि “देवगिरी ते देवराई” नाम फलकाचे अनावरण करुन राज्यव्यापी वृक्षसंवर्धन अभियानाच्या शुभारंभप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी वनसंरक्षक आशिष ठाकरे उपवनसंरक्षक अभिजित वायकोस, सहाय्यक वनसंरक्षक अतुल जैनक, उप विभागीय अधिकारी उत्तम दिघे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अमोल पवार, वन परिक्षेत्र अधिकारी अश्विनी शिंदे, नगराध्यक्ष सचिन सातव, अभिनेता तथा सह्याद्री देवराई फाऊंडेशनचे सयाजी शिंदे यांच्या लोकप्रतिनिधी, सामाजिक संघटनेचे प्रतिनिधी उपस्थित होते.
श्रीमती पवार म्हणाल्या, पर्यावरण रक्षण ही आजच्या काळाची सर्वात मोठी गरज बनली आहे. शासन, उद्योग, सामाजिक संस्था आणि जनसहभाग यांच्या योग्य समन्वयातूनच आणि एकत्रित प्रयत्नांतूनच हरित, समृद्ध आणि शाश्वत महाराष्ट्राचं स्वप्न साकार होईल. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेली पर्यावरण संवर्धनाची ही प्रेरणा एका व्यापक चळवळीत रूपांतरित करूया आणि आपल्या महाराष्ट्राला सुजलाम् सुफलाम् बनवूया, असे आवाहन त्यांनी केले.
दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नावाने उभारले जाणारे हे पर्यटन उद्यान निसर्गाशी जोडणारा, पर्यावरण शिक्षण देणारा आणि भावी पिढीला प्रेरणा देणारा केंद्रबिंदू बनेल, असा विश्वास व्यक्त करुन त्या पुढे म्हणाल्या, त्यांनी संपूर्ण राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी अथक परिश्रम घेतले आहेत. बारामतीवर तर त्यांचे विशेष प्रेम होते. हे उद्यान म्हणजे केवळ एक पर्यटनस्थळ नाही, तर बारामतीच्या प्रगती आणि दूरदृष्टीचं एक प्रतिक आहे. तसेच पर्यावरणाचं रक्षण करण्यासाठी आणि भावी पिढीला निरोगी आयुष्य देण्यासाठी मैलाचा दगड ठरणार आहेत.
कन्हेरी येथील पर्यटन उद्यानाची संकल्पना, नियोजन व उभारणीमध्ये मोलाचं योगदान होते. कन्हेरी इथील राखीव वनातील ५५ हेक्टर क्षेत्रावर आतापर्यंत ८ कोटी ७५ लाख इतका निधी प्राप्त झाला आहे. त्या माध्यमातून दोन टप्प्यात काम होत आहे. त्यामध्ये पाथये सस्पेन्सन ब्रिज, सोलार पार्क, रॉक आणि बटरफ्लाय गार्डन विकसीत करण्यात आले आहे. या ठिकाणी देशी झाडांचे महत्व लक्षात घेऊन त्यांची जास्तीत-जास्त लागवड केली पाहिजे. “देवगिरी ते देवराई” राज्यव्यापी वृक्षसंवर्धन अभियानाच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सहकार्य केल्याबद्दल वनमंत्री गणेश नाईक यांचे आभार मानले, त्या पुढे म्हणाल्या पर्यावरण संवर्धन, वृक्षलागवड आणि वनवृद्धीबाबत त्यांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद, बहुमूल्य सहकार्यामुळे या अभियानाला निश्चितच एक नवी गती आणि ऊर्जा मिळेल, असा विश्वास व्यक्त आहे.
सयाजी शिंदे यांनी पर्यावरण संवर्धनाला केवळ एक शासकीय कार्यक्रम किंवा औपचारिकता न ठेवता त्याला एका मोठ्या लोकचळवळीचं स्वरूप दिलं आहे.
‘देवगिरी ते देवराई’ या अभियानासाठी त्यांची आंतरिक प्रेरणा आणि त्यांचे सातत्यपूर्ण योगदान महत्वाचे आहे. हे अभियान केवळ एका विभागाचे किंवा शासनाचे नाही, तर हा आपल्या सर्वांचा एक सामूहिक संकल्प आहे. या स्तुत्य उपक्रमासाठी आणि अभियानासाठी मोलाचे सहकार्य करणाऱ्या वन विभाग, सामाजिक वनीकरण विभाग, मुबंई पोर्ट ऑथॉरिटी, सह्याद्री देवराई फाउंडेशन, एन्व्हायरमेंटल एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया संयुक्त वन व्यवस्थापन समित्या, इको डेव्हलपमेंट कमिट्या, विविध सीएसआर भागीदार, औद्योगिक संस्था, स्वयंसेवी संस्था, शैक्षणिक संस्था, ग्रामपंचायती, स्वयंसेवक जोडले गेले आहे. सर्वांनी एकत्र येऊन दाखवलेलं हे स्वारस्य आणि केलेले प्रयत्न खरोखर कौतुकास्पद आहेत.
महाराष्ट्र हे निसर्गसंपन्न राज्य असून विविध ऐतिहासिक पर्वतांपासून किनारपट्टीपर्यंत, घाटमाथ्यापासून विदर्भाच्या मैदानांपर्यंत राज्यात विपूल वनसंपदा आणि जैवविविधता मोठ्या प्रमाणात आहे. मात्र, बदलते हवामान, वाढते शहरीकरण, मानवी हस्तक्षेपामुळे ही संपदा आता धोक्यात आली आहे. अशावेळी देवगिरी ते देवराई सारखे अभियान फक्त वृक्षलागवडीचं नाही तर एक जनजागृती, संरक्षणाचं आणि शाश्वत विकासाचं अभियान आहे, असेही श्रीमती पवार म्हणाल्या. यावेळी श्री. शिंदे यांनी आपले विचार व्यक्त केले.
००००