मुंबई दि. १५ – भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात सांस्कृतिक कार्य, माहिती तंत्रज्ञान मंत्री तथा पालकमंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
पालकमंत्री ॲड. शेलार यांनी यावेळी स्वातंत्र्य सैनिक, शहीद सैनिकांचे कुटुंबीय, स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक यांची भेट घेऊन त्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात विकसित भारत 2047 संकल्पात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, आमदार झिशान सिद्दिकी, जिल्हाधिकारी सौरभ कटियार, पोलीस उपायुक्त निमित गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल, उपजिल्हाधिकारी सुभाष काकडे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व स्वातंत्र्य सैनिक, शहीद सैनिकांचे कुटुंबीय, स्थानिक लोकप्रतिनिधी, नागरिक आदी यावेळी उपस्थित होते.
पालकमंत्री ॲड. आशिष शेलार व केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते, दक्षिण आफ्रिकेतील 90 किमी अंतराची ‘द अल्टिमेट ह्युमन रेस’ नावाने ओळखली जाणारी खडतर मॅरेथॉन स्पर्धा सलग दुसऱ्या वर्षी यशस्वीपणे पूर्ण केल्याबद्दल तहसीलदार युवराज बांगर यांचा तसेच गुणवंत विद्यार्थी व गुणवंत कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.
0000