भारतीय लोक प्रशासन संस्थेमार्फत एस. एस. गडकरी स्मृती पुरस्कार आणि बी. जी देशमुख निबंध स्पर्धेतील विजेत्यांना बक्षिस वितरण 

मुंबई, दि. २६ :- भारतीय लोक प्रशासन संस्थेच्या महाराष्ट्र विभागीय शाखेमार्फत भारतीय प्रशासन सेवेत नाविन्यपूर्ण कामगिरी केलेल्या हर्ष ए. पोद्दार (भा.प्र.से.) आणि असिमा मित्तल (भा.प्र.से.) यांना दिवंगत एस. एस. गडकरी स्मृती पारितोषिक वितरण संस्थेचे अध्यक्ष स्वाधीन क्षत्रीय यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

भारतीय लोकप्रशासन संस्थेच्या महाराष्ट्र विभागीय शाखेची वार्षिक सर्वसाधारण सभा मंत्रालय येथे आयोजित करण्यात आली होती. यावेळी खजिनदार विकास देवधर यांच्यासह जयराज चौधरी, शशांक बर्वे आणि संस्थेचे पदाधिकारी यांच्यासह सदस्य उपस्थित होते.

यावेळी कायदा अंमलबजावणी प्रशासन, आंतर-एजन्सी सहकार्य आणि सेवा वितरणात कृत्रिम बुद्धिमत्तेचा अवलंब करण्यास चालना देणाऱ्या ‘मार्व्हल’ (Maharashtra Research and Vigilance for Enhanced Law Enforcement) मध्ये केलेल्या कामगिरीबद्दल  जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी हर्ष पोद्दार, यांना तर असिमा मित्तल यांनी नाशिक जिल्हा परिषद येथे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर कार्यरत असताना ग्रामीण भागात शिक्षण क्षेत्रात नाविन्यपूर्ण उपक्रम राबविल्याबद्दल पुरस्कार देण्यात आला.

भारतीय लोकप्रशासन संस्थेच्या महाराष्ट्र विभागीय शाखेमार्फत सन २०२४- २०२५ या वर्षात आयोजित केलेल्या दिवंगत बी.जी देशमुख निबंध स्पर्धेतील विजेत्यांनाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक वितरण करण्यात आले.

या स्पर्धेतील प्रथम क्रमांकाचे दहा हजार रुपयाचे पारितोषिक मंजुषा चौधरी यांना,  रुपये सात हजार ५०० चे द्वितीय पारितोषिक संजयकुमार ओंकार यांना, रुपये पाच हजाराचे तृतीय पारितोषिक शलाका पवार यांना आणि उत्तेजनार्थ रुपये दोन हजाराचे पारितोषिक माया तेली यांना  देण्यात आले.

‘विकसित भारत २०४७’ उपेक्षितांसाठी सार्वजनिक धोरण आणि शासन सेवेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग या विषयावर घेण्यात आलेल्या निबंध स्पर्धेत ७६ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.

००००

राजू धोत्रे/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *