प्रांतीय अस्मितेसह अखिल भारतीय अस्मिता जपूयात –  राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

नागपूर,  दि. ३ :- छत्रपती शिवाजी महाराज यांनी अन्यायाच्या विरुद्ध लढा दिला. हिंदवी स्वराज्यासाठी त्यांनी संघर्ष केला. हिंदवी स्वराज्यासाठी ते लढले. ते परिवारासाठी नाही तर सर्व समाजासाठी लढले हे आपण लक्षात घेतले पाहिजे. तिरुवन्नामलाई येथील मंदिराचा जीर्णोद्धार त्यांनी केला. महाराष्ट्रीयन असो, तमिळ असो, कन्नड असो अथवा अन्य प्रांतीय, आपण प्रत्येकजण आपल्या प्रांतीय अस्मितेसह अखिल भारतीय अस्मितेसाठी अधिक कटिबद्ध आहोत, ही आपली शक्ती असल्याचे प्रतिपादन राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांनी केले.

राजभवन नागपूर येथील दरबार हॉलमध्ये तमिळ बांधवांच्या स्नेहमिलन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी, सेंथिल कुमार, के जगदिसन, श्रीमती रीमा मोहन, अतुल मोघे यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.

नागपूर येथे तमिळच्या विविध संस्था अजूनही त्यांनी एकात्मतेचा भाव जपला आहे. नागपूर महानगराशी एकात्म भाव जपला. आजचा हा कार्यक्रम त्या एकात्मतेचे प्रतीक असल्याचे सांगून त्यांनी सर्व पदाधिकाऱ्यांचा गौरव केला.

आर.रामकृष्णन व श्रीमती प्रीती रामकृष्णन लिखित “भारतीय ज्ञान परंपरा” या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन यांच्या हस्ते करण्यात आले. आपल्या वेदांमध्ये दडलेले ज्ञानभंडार डिजिटल स्वरूपात जतन केले असून या पुस्तकाच्या माध्यमातून ते उपलब्ध करून देताना मला आनंद होत असल्याची भावना आर रामकृष्णन यांनी आपल्या भाषणात व्यक्त केली.

सर्व तमिळ संस्थांनी एकत्र यावे देशासाठी एकात्मता साधावी यासाठी आम्ही काही महिन्यापूर्वी प्रयत्न केले. माननीय राज्यपाल महोदयांनी याचे स्वागत करून नागपूर येथील राजभवनातील या कार्यक्रमाला आकार दिल्याचे सेंथिल कुमार यांनी आपल्या मनोगतात सांगितले. तमिळ समाज ज्या भागात गेला त्या भागाच्या विकासासाठी तो झटला, त्या भागाशी एकरूप होऊन एकात्म झाल्याचे ते म्हणाले. आपल्या देशातील विविधतेतून एकात्मतेची ओळख प्रत्येकाने जपली पाहिजे असे आवाहन त्यांनी दिले.

विविधतेतून प्रगल्भता साधत तामिळ बांधवांनी आज सर्व क्षेत्रात यश साध्य केले आहे. या ऐक्याचे, एकात्मतेचे प्रतीक म्हणून या कार्यक्रमाकडे आपण पाहिले पाहिजे. असे अतुल मोघे यांनी आपल्या मनोगतात भावना व्यक्त केली.

कार्यक्रमाची सुरुवात श्रीमती अरुणा विजयाकुमार यांच्या सृश्राव्य गायनाने झाली. यानंतर प्रतिभा नृत्य मंदिरच्या विद्यार्थिनींनी भरतनाट्यम सादर केले. बँक ऑफ इंडियाचे निवृत्त मुख्य व्यवस्थापक तथा कांचि कामकोठी पिठाचे को-कन्वेनर जी.चंद्रशेखरन यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले.

यावेळी अतुल मोघे, सेंथिल कुमार यांनी मनोगत व्यक्त केले. श्रीमती रामा मोहन यांनी  उपस्थितांचे आभार मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे संचलन अरविंद कुमार यांनी केले. आभार के एस एस कृष्णन यांनी मानले.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *