प्रशासकीय गुणांकनात महिला व बालविकास विभाग प्रथम – मंत्री आदिती तटकरे

मुंबई दि. ०१ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून व संकल्पनेतून शासन-प्रशासन व नागरिकांमधील विश्वास वृद्धिंगत होण्यासाठी राबविलेल्या 100 दिवसांच्या कार्यक्रम अंतर्गत कार्यालयीन मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात महिला व बालविकास विभाग सर्वोत्तम मंत्रालयीन विभाग ठरला, असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

परिवर्तनशील व सर्वंकष विकासाच्या वाटचालीच्या मोहिमेत महाराष्ट्रातील प्रत्येक अंगणवाडी सेविका, प्रत्येक लाभार्थी आणि प्रत्येक कर्मचाऱ्याची कर्तव्यनिष्ठा आहे. सर्व सहकारी, महिला व बालविकास विभागाच्या राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर, महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त कैलास पगारे, महिला व बाल विकास आयुक्त नयना गुंडे, जिल्हा प्रशासन आणि महिला व बालविकास विभागाचे सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांच्या योगदानाने हे उद्दिष्ट गाठता आले असल्याचे महिला व बालविकास मंत्री तटकरे यांनी सांगितले.

भारतीय गुणवत्ता परिषदेमार्फत वेबसाईट कार्यक्षमता, कार्यालयीन सोयीसुविधा, तक्रार निवारण व्यवस्था, गुंतवणूक अनुकूलता, नागरिकांसाठी सेवा-सुलभता, तंत्रज्ञान वापर अशा दहा निकषांवर आधारित मूल्यमापन करून विभागाने 80 टक्के गुण प्राप्त केले असल्याची माहिती त्यांनी दिली.

विभागाची वेबसाइट कंटेंट मॅनेजमेंट सिस्टमचा वापर करून विभागाच्या सर्व योजनाही अद्यावत करण्यात आल्या आहेत, तसेच माहितीचा अधिकार अंतर्गत देखील सर्व माहिती उपलब्ध करून देण्यात आली आहे. या संकेतस्थळाचे सिक्युरिटी ऑडिट, त्याचबरोबर Right to Service Act खाली अधिसूचित सेवांची यादी, केंद्र शासनाशी संपर्क साधून 13 हजार 11 मिनी अंगणवाडी केंद्रांचे अंगणवाडीत रूपांतर करण्यात आले आहे. तसेच 9 हजार 664 अंगणवाडी केंद्रांना शौचालयाची व्यवस्था पुरवण्यात आली, केंद्र सरकारच्या प्रशिक्षणाच्या धोरणानुसार 37 हजार अंगणवाडी सेविकांना “पोषण भी, पढाई भी” चे प्रशिक्षण व FSSAI चे प्रशिक्षण दिले आहे. नवीन 10 one stop centre ला मान्यता देण्यात आली आहे. केंद्राने दिलेल्या सर्व लक्षांक महाराष्ट्र शासनाने पूर्ण करून पोषण पखवाडीमध्ये महाराष्ट्राने देशात पहिला क्रमांक मिळवला. 17 हजार 254 अंगणवाडी केंद्रांमध्ये पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आलेली आहे. 13 हजार 595 अंगणवाडी केंद्रांचे सक्षम अंगणवाडी केंद्रामध्ये रुपांतर करण्यात आले आहे. त्याचबरोबर दत्तक प्रक्रियेमध्ये 537 बालके कायदेशीररित्या हस्तांतर करुन देशात प्रथम क्रमांक मिळवला आहे. केंद्र सरकारकडून प्राप्त निधीतून कार्यालयीन कामकाजाबाबत स्वच्छता, तक्रार निवारण, जुन्या वाहनाचे निर्लेखन, जुन्या दस्तऐवजांचे निर्लेखन, कार्यालयीन सोयीसुविधा यावर लक्ष देत कामात सुधारणा करण्यात आली आहे. बचतगटांच्या माध्यमातून महिलांना आर्थिक सक्षमतेसाठी प्रोत्साहन देण्यात आले.

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या सारखे नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले. UCDC व महिला व बालविकास भवन यासारखे देखील नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आले. असे विविध उपक्रम राबवून व दिलेले उद्दिष्ट पूर्ण करून सांघिक कार्याने महिला व बालविकास विभाग सर्वोत्तम ठरला असल्याचे महिला व बालविकास मंत्री तटकरे यांनी सांगितले.

०००

श्रद्धा मेश्राम/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *