प्रभावी डेटा व्यवस्थापनामुळे शासन अधिक पारदर्शक, वेगवान आणि नागरिकाभिमुख – सुमनेश जोशी

मुंबई,दि.२०: डिजिटल युगात डेटा हीच खरी शक्ती असून प्रभावी डेटा व्यवस्थापनामुळे शासन अधिक पारदर्शक, वेगवान आणि नागरिकाभिमुख होत असल्याचे भारत सरकारच्या संचार मंत्रालयाचे उपमहासंचालक  सुमनेश जोशी यांनी सांगितले.

भारतीय लोकप्रशासन संस्था  महाराष्ट्र प्रादेशिक शाखेच्या वतीने मंत्रालयातील अधिकाऱ्यांसाठी परिषद सभागृहात आयोजित “डिजिटल गव्हर्नर मेड सिंपल व्हॉट एव्हरी ऑफिस मस्टनो” या विषयावरील प्रशिक्षण कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी भारतीय लोकप्रशासन संस्था  महाराष्ट्र प्रादेशिक शाखेचे अध्यक्ष स्वाधिन क्षत्रिय, मानद खजिनदार  विकास देवधर आणि विशेष कार्य अधिकारी शशांक यशवंत बर्वे, यांची उपस्थित होते.

सुमनेश जोशी म्हणाले, कागदी फाईल्सऐवजी डिजिटल वर्कफ्लो, नोंदवहींऐवजी डॅशबोर्ड आणि विलंबाऐवजी रिअल-टाइम मॉनिटरिंगकडे प्रशासनाची वाटचाल झाली आहे.

डेटा संरचना, अचूक डेटा संकलन, पेपरलेस कामकाज आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) च्या वापरावर त्यांनी भर दिला. डिजिटल पब्लिक इन्फ्रास्ट्रक्चर (डीपीआय) ला डिजिटल महामार्गाची उपमा देत आधार आणि एमआधार ॲपद्वारे डेटा सुरक्षित ठेवण्याबाबत माहिती त्यांनी दिली. तसेच सायबर सुरक्षेसाठी ‘संचार साथी’ पोर्टल वापरण्याचे आवाहन केले.

प्रशिक्षणार्थी आणि शासकीय अधिकारी/ कर्मचारी यांना डिजिटल गव्हर्नन्स या विषयाबाबत भविष्यात काही नवीन प्रश्न, शंका, मुद्दे उपस्थित झाल्यास फोन करून ईमेल पाठवून केव्हाही विचारू शकता असे जोशी यांनी यावेळी सांगितले.

०००

राजू धोत्रे/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *