परस्पर सहकार्यामुळे महाराष्ट्र-सिंगापूर व्यावसायिक संबंध अधिक दृढ – मंत्री जयकुमार रावल

मुंबई दि. १७: सिंगापूरचे महावाणिज्य दूत चेआँग मिंग फूंग यांनी राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी वाणिज्यदूतांनी त्यांना येऊ घातलेल्या ‘सिंगापूर नॅशनल डे रिसेप्शन’ साठी निमंत्रण दिले. तसेच सिंगापूरचे उपपंतप्रधान गॅन किम यॉन्ग यांनी नुकत्याच केलेल्या महाराष्ट्र दौऱ्याच्या सकारात्मक परिणामांवर चर्चा केली.

उपपंतप्रधानांच्या  भेटीत पीएसएचा भारत मुंबई कंटेनर टर्मिनल (दुसरा टप्पा) आणि कॅपिटल लँडच्या नवी मुंबई डेटा सेंटरची पाहणी, मॅपलट्री कंपनीकडून सुमारे तीन हजार कोटींच्या गुंतवणुकीसह औद्योगिक व लॉजिस्टिक पार्क आणि नवीन डेटा सेंटर उभारणीसाठी करार, पीएसएचा दुसरा टप्पा पूर्ण झाल्यानंतर भारतातील सर्वात मोठे कंटेनर टर्मिनल, शाश्वत जहाजवाहतूक मार्ग आणि डिजिटल व्यापार सुविधा उभारण्यावर लक्ष आदी महत्त्वाच्या मुद्यांच्या माध्यमातून या दौऱ्यामध्ये सिंगापूरने महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ केला असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

याचबरोबर महाराष्ट्र-सिंगापूर यांच्यातील दीर्घकालीन आर्थिक सहकार्याला नवी गती देण्याबाबत राजशिष्टाचार मंत्री श्री.रावल आणि सिंगापूरच्या महावाणिज्य दूतांमध्ये चर्चा झाली. सिंगापूर हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा परकीय थेट गुंतवणूकदार आहे. कॅपिटल लँडसारख्या कंपन्यांनी मुंबई व पुण्यातील बिझनेस पार्क, डेटा सेंटर आणि लॉजिस्टिक सुविधांमध्ये 19,200 कोटींपेक्षा अधिक गुंतवणूक केली आहे.

महाराष्ट्र-सिंगापूर सहकार्यामुळे आयटी, सेवा आणि उत्पादन क्षेत्रात रोजगार व विकासाची संधी निर्माण होत आहे. तसेच पायाभूत सुविधा प्रकल्पांना वेग येत असून हरित व डिजिटल व्यापार मार्गांच्या उभारणीतून शाश्वत आर्थिक विकास साध्य करण्याचा प्रयत्न असल्याचे मंत्री रावल यांनी यावेळी सांगितले.

०००

बी.सी.झंवर/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *