दिल्लीतील पब्लिक स्कूलच्या मुख्याध्यापक व शिक्षणतज्ज्ञांच्या शिष्टमंडळाची राज्यपालांशी भेट

मुंबई, दि. १९ : दिल्लीतील विविध पब्लिक स्कूलचे मुख्याध्यापक आणि शिक्षणतज्ज्ञ यांच्या शिष्टमंडळाने राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची लोकभवन येथे भेट घेतली. शिष्टमंडळाचे नेतृत्व मॉडर्न पब्लिक स्कूल, शालीमार बागच्या प्राचार्या डॉ. अलका कपूर यांनी केले.

यावेळी शिक्षणतज्ज्ञांनी शिक्षकांच्या बदलत्या भूमिकेवर चर्चा केली. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि हवामान बदलामुळे वेगाने बदलणाऱ्या जगासाठी विद्यार्थ्यांना तयार करण्याबरोबरच त्यांच्यामध्ये जबाबदार आणि सामाजिकदृष्ट्या संवेदनशील नागरिकत्वाची भावना विकसित करण्यावरही त्यांनी भर दिला. राज्यपाल जिष्णु देव वर्मा म्हणाले की, पब्लिक स्कूल्सनी देशाला विविध क्षेत्रांमध्ये नेतृत्व करणाऱ्या अनेक व्यक्ती दिल्या आहेत. उत्तम शिक्षक केवळ शिकवत नाही, तर ते प्रेरणा देतात.

पब्लिक स्कूल्सनी केवळ शैक्षणिक अभ्यासक्रमापुरते मर्यादित न राहता गुरूंप्रमाणे मार्गदर्शकाची भूमिका बजावावी आणि विद्यार्थ्यांमध्ये चारित्र्य, मूल्ये व जीवनातील उद्दिष्टाची जाणीव निर्माण करावी, असे आवाहन त्यांनी केले. शिक्षणामध्ये भारतीय ज्ञान प्रणालीचा समावेश करण्याचे महत्त्वही राज्यपालांनी अधोरेखित केले. विद्यार्थ्यांच्या जडणघडणीच्या काळात त्यांच्या व्यक्तिमत्वाचे मूल्यवर्धन होईल, याकडेही लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

“आजची मुले माहितीने समृद्ध आहेत; मात्र त्या माहितीचे सखोल ज्ञान त्यांनी मिळविले पाहिजे. शिक्षणतज्ज्ञ केवळ नेते घडवत नाहीत, तर त्यांनी चांगली माणसेही घडवली पाहिजेत,” असे राज्यपाल वर्मा म्हणाले.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *