डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी व्यक्त केला शोक

मुंबई, दि. ४ : ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी तीव्र शोक व्यक्त केला आहे.

शिक्षण, आरोग्य, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात डॉ. डी. वाय. पाटील यांनी उभारलेले कार्य सदैव स्मरणात राहील. आपल्या दूरदृष्टीपूर्ण नेतृत्वातून त्यांनी अनेक शैक्षणिक व सामाजिक संस्थांची उभारणी करून असंख्य विद्यार्थ्यांना ज्ञान, शिक्षण व प्रगतीची संधी उपलब्ध करून दिली, असे त्यांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी केलेले कार्य अत्यंत प्रेरणादायी असून, त्यांच्या कार्याचा ठसा महाराष्ट्रासह देशाच्या सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रावर कायम राहील. त्यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक महान शिक्षणमहर्षी, दूरदृष्टीचे समाजसेवक आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व गमावले आहे. त्यांची समाजाप्रती असलेली निष्ठा, कार्यतत्परता आणि लोककल्याणाची भावना भावी पिढ्यांना सदैव मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरेल, असेही राज्यमंत्री मिसाळ यांनी म्हटले आहे.

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांच्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करताना, राज्यमंत्री मिसाळ  यांनी त्यांच्या कुटुंबीयांच्या व आप्तेष्टांच्या दुःखात आपण सहभागी असल्याची भावना व्यक्त केली आहे. परमेश्वर दिवंगत आत्म्यास चिरशांती देवो व त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती प्रदान करो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

0000

श्रद्धा मेश्राम/विसंअ

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *