ठाणे खाडी पूल क्र. ३ दक्षिण वाहिनीमुळे वाशी पुलावरील वाहतूककोंडी कमी होईल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

ठाणे,दि.05 (जिमाका):- ठाणे खाडी पूल क्र. 3 दक्षिण वाहिनीमुळे वाशी पुलावर निर्माण होणारी वाहतूककोंडी आता मोठ्या प्रमाणावर कमी होईल. लाखो प्रवाशांचा अमूल्य वेळ आणि इंधन यामुळे वाचणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

सायन-पनवेल महामार्गावरील ठाणे खाडी पूल क्रमांक तीन दक्षिण वाहिनीचे लोकार्पण दूरदृश्यप्रणालीद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मुंबई–पुणे द्रुतगती मार्गावरील ‘मिसिंग लिंक’ प्रकल्प लवकरच पूर्ण होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर मुंबई–पुणे प्रवास अधिक वेगवान, सुलभ आणि सुरक्षित होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ, सार्वजनिक बांधकाम (सा. उ.) राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, ठाणे जिल्ह्यातील आमदार किसन कथोरे, निरंजन डावखरे, शांताराम भोईर, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सचिव मनिषा म्हैसकर, महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे उपाध्यक्ष अनिल गायकवाड, ठाण्याचे जिल्हाधिकारी अशोक शिनगारे आदी उपस्थित होते.

ठाणे खाडी पूल क्र. 3 दक्षिण वाहिनीची संक्षिप्त माहिती:-

ठाणे खाडीवर आधीपासून मानखुर्द-वाशी दरम्यान दोन पूल कार्यरत आहेत. या नवीन पुलामुळे इतर दोन पुलांवर येणारा वाहतुकीचा ताण कमी होण्यास मदत होणार आहे. तसेच या तिसऱ्या पुलाच्या मुंबई ते नवी मुंबई आणि नवी मुंबई ते मुंबई या दोन्ही उत्तर आणि दक्षिण मार्गांचे बांधकाम पूर्ण झाले आहे. खाडीवर उभारण्यात आलेल्या या प्रत्येक मार्गिकेची लांबी 3.18 किलोमीटर आहे. ठाणे खाडीवर आव्हानात्मक स्थितीत उभा राहिलेला पूल अभियांत्रिकी कौशल्याचा उत्तम नमुना म्हणून नावारूपाला आला आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या सहाय्याने पुलाची निर्मिती होणे, ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची गोष्ट आहे.

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *