चिपी–मुंबई हवाई सेवा जलदगतीने सुरू व्हावी – मंत्री नितेश राणे

मुंबई, दि. ७ : सिंधुदुर्ग  जिल्हा हा पर्यटन जिल्हा असून जिल्ह्यातील चिपी विमानतळावरून चिपी- मुंबई, मुंबई-चिपी ही विमान सेवा जलदगतीने सुरु व्हावी यासाठी संबंधित अधिकाऱ्यांनी आवश्यक कार्यवाही तातडीने पूर्ण करावी, असे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी दिले.

मंत्री राणे यांच्या अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील चिपी विमानतळावरून मुंबईसाठी सेवा सुरू करण्याबाबत बैठक झाली. बैठकीस विमानचालनचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे (दूरदृश्य प्रणालीद्वारे) चिपी विमानतळाचे संचालक कुलदीप सिंह, महाराष्ट्र विमानतळ कंपनीच्या व्यवस्थापक प्रांजली खवळे, कार्यकारी अभियंता मिस्बाह अन्वार आदी उपस्थित होते.

मंत्री राणे म्हणाले, चिपी मुंबई  हवाई वाहतूकीकरिता शासनाकडून Viability Gap Funding (VGF) मंजूर आहे. यासाठी संबंधित कंपनीने विमानसेवा तातडीने सुरू करण्यासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात यावी. मुंबईसाठी सकाळी व सायंकाळी विमान सेवा सुरू करण्याबाबतही कंपनीने विचार करावा.

चिपी मुंबई  विमान सेवा सूरू करण्यासाठी आवश्यक सुरक्षा परवानग्यासह अन्य परवाने घेण्याची कार्यवाही सुरू असल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

०००

एकनाथ पोवार/स.सं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *