चिपी – मुंबई विमानसेवा तातडीने सुरू करण्याची प्रक्रिया पूर्ण करावी – मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे

मुंबई, दि. ३ : मुंबई – चिपी विमानसेवा सुरू करण्यासाठीची प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी. ही विमानसेवा सुरू करण्यासाठी राज्य शासन सकारात्मक असून यासाठी शासनाने ‘उडान’च्या धर्तीवर ‘आरसीएस’ फंडिंगचा निर्णय घेतला आहे. ही प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी संबंधित यंत्रणांना दिले.

मंत्रालयात चिपी – मुंबई विमानसेवा विषयी बैठक झाली. त्यावेळी मंत्री श्री. राणे बोलत होते. बैठकीस विमानतळ प्राधिकरण आणि विमानतळ ऑपरेटर कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

चिपी – मुंबई विमानसेवा सुरू होणे ही सिंधुदुर्गसाठी भावनिक बाब असल्याचे सांगून मंत्री श्री. राणे म्हणाले की, या विमानतळासाठीच्या पायाभूत सुविधाही लवकरात लवकर पूर्ण कराव्यात. सिंधुदुर्ग हा पर्यटन जिल्हा असल्याने चिपी विमानतळास वेगळे महत्व आहे. चिपी – मुंबई विमानसेवा सुरू करण्यासाठी लागणाऱ्या सर्व परवानग्या एक महिन्यात घेण्यात याव्यात. विमानतळ प्राधिकरण आणि विमानतळ ऑपरेटर कंपनी यांनी समन्वयाने काम करावे. भविष्यात या विमानतळाला मोठे महत्त्व येणार असल्याने यासंदर्भातील कामे प्राधान्याने करावीत, असे निर्देशही मंत्री श्री. राणे यांनी दिले.

0000

हेमंतकुमार चव्हाण/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *